कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९.९.१४

तुझे देणे...

तुझ्यासारखे सहज देणे जमले असते तर,
दाता होणे आवडले असते,
तुझ्यासारखे हसून घेणे जमले असते तर,
याचक होणे आवडले असते...
देण्या-घेण्यामधली भावना; इतरांचे सुख पाहणे,
कळले असते तर,
तुझ्यासारखे सुखी राहणे जमले असते...
देता आलं नाही, घेता आलं नाही,
हिशोब ठेवत गेलो केवळ,
जगता आलं नाही...

पण त्या हिशोबांच्या चोपडीमध्ये, तू प्रेमानं दिलेलं मोरपीस तेवढं
सुख म्हणून जपून ठेवलंय,
त्या एका देण्यातून कधी मुक्त होता आलं नाही...
- हर्षल (१३/०२/१४ - रा. ११.२०)

२६.७.१४

निरोप

निरोप देणे, निरोप घेणे अवघड जागचे दुखणे आहे...

काही निरोप, "पुन्हा लवकरच भेटू", म्हणून हसत दिले जातात!
तर काही निरोप, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी, अश्रूंसोबत द्यावे लागतात...

खरा प्रश्न तर पुढे आहे,
जेव्हा पुन्हा कधी भेटू याची, आणि भेटलो तरी; आज जसे आहोत
तसेच राहील, याची शाश्वती नसेल...
ओळख काही क्षणांची असेल किंवा नातं अगदी जुनं असेल,
पण निरोप हसून द्यावा की अश्रू रोखून द्यावा?

ह्या प्रश्नांना निरोप देणे जमेल तेव्हा जमेल,
तुर्तास केवळ आहे हे असं आहे, मानून चालावे...
निरोप देणे, निरोप घेणे जीवनाचे अटळ मागणे आहे...

-Harshal (26/07/14 - 12.45 PM)

२४.२.१४

काही क्षण असायचे...

काही क्षण असायचे,
माझे मोजके बोलायचे,
मग यायची नि:शब्दता,
अन् स्वतःला सावरायचे...

आतल्या आत झुरणारे,
क्षण सर सर सरणारे,
श्वास खोल खोल जाणारे,
पाय जड जड होणारे...

भोवती जगरहाटी तशीच,
अव्याहत चालणारी,
आणि आतली खळबळ तिथेच,
भोवर्‍यासारखी घुमणारी...

तुझ्या साथीने कधी सुसह्य झालेली,
तुझ्या सोबतही अगदी असह्य वाटलेली,
ही वाट मला आजही खूप भावलेली,
जिथे आशेची ज्योत अजुनही तेवलेली...

आता विसर होतो आहे,
गोंधळल्या त्या क्षणांचा,
तुझ्या मुक्या ओठांवरच्या,
काही अबोल पणांचा...

जिथे मंदावली वाट,
तिथे घट्ट झाले हात,
शब्द मोकळे जाहले,
आले नेटक्या ओघात...

बाकी सारे लख्ख होते,
दोन क्षण स्तब्ध होते,
त्या क्षणांनी बदलले,
माझे प्रारब्ध होते...

आता ह्याच आठवणी,
तुझ्या माझ्या एक मनी,
आली सांज मोहरूनी,
भर प्रेमाची करूनी...

असे काय तेव्हा होते,
ज्याने रोखलेले होते,
तुला आधीच मिळाले,
मला कळले न होते?

पण तेव्हा काही क्षण असायचे,
तुझे मोजके हसायचे,
मग यायची प्रसन्नता,
सारे हलके हलके व्हावयाचे...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१०/१२/११-दु. ४.१५)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

१५.२.१४

मैत्रीमधले यात्री आपण...

आपण दोघे प्रवासातले, थोडे थोडे अंतर,
चालत जाता उगाच वाटे, झाले जंतर मंतर...
संपून जाते वाटच आणि संपत नाहीत गप्पा,
मैत्रीमधला जपलेला हा आयुष्याचा कप्पा...

उमटत जाते हृदयामध्ये प्रेमाची लकेर,
थोपवण्याचा हट्ट नाचतो मनात मांडून फेर,
हातामधल्या हातांना मग स्पर्शांचे उलगडणे,
अर्थांना, नात्यांना देता नावे; का अवघडणे?

क्षणिक मोहही चुकवून ठोका हॄदयाचा जातो,
वादळात सावरणारा मग हात मैत्रीचा होतो...
प्रेमाचे पण नाते होते, नात्यांचा होतो गुंता,
मैत्रीला पण भासत नाही, कधीच असली चिंता...

आपण दोघे मैत्रीमधले यात्री आनंदाचे,
सोबत चालत जाणे, जगणे अनंत क्षण सुखाचे...
कधी न संपो वाट आपली, थांबाव्या ना गप्पा,
मैत्रीमधला जपलेला हा आयुष्याचा कप्पा...
-हर्षल (१५/०२/१४ - दु. २.१५)

२२.१.१४

माझं फेसबूक पेज...

मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

सहज कधी आठवण येते त्या मित्रांची जे आता या जगात नाहीत,
पण तरीही त्यांना फ्रेंडलिस्टमधून उडवता येत नाही,
"मला विसरलास यार तू" म्हणून, जणू रागे भरतील, असतील तिथे...
त्यांच्या पेजवर स्पष्टपणे दिसते त्यांच्या असण्या-नसण्यातली रेषा,
त्यांची शेवटची पोस्ट आणि त्यावरती जगाने घातलेला RIP :'( च्या पोस्टचा रतीब...
ते गेल्यानंतरही, केवळ फेसबूक सांगतं या दिवशी ते जन्मले होते,
म्हणून हॅपी बर्थडे विशेस...
आणि क्षणभर वाटतं, काय खरं समजावं?
या शुभेच्छा की तो मित्र गेल्याचं दु:ख?
कालांतराने ते ही आठवणीतून निघून गेलेलं...
त्याला स्वतःला कधी तरी येऊन ते पेज पाहता येईल का?
आणि एखाद्या तरी पोस्टला उत्तर देता येईल का?

जगतांना; प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्यासाठी असलेल्या फेसबूकच्या भिंतीवर,
मेल्यानंतर, एकदाच... फक्त एकदाच, येऊन सारं साफ करून,
कुणाला तरी सांगायचे राहिलेले दोन प्रेमाचे शब्द लिहून जाता येणार असेल तर...

तसं होणार नाही म्हणून,
मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

- हर्षल (२२/०१/२०१४ - रा. ११.००)

२९.१२.१३

अपूर्ण कविता...

काल आणि परवा, दोन जुन्या मैत्रिणी भेटल्या,
एकीने हळवं होत, डोळ्यांत पाहत विचारलं, "अजुनही कविता करतोस का रे?"
दुसरीने शुन्यात पाहत, कोरडेपणानं विचारलं, "अजुनही कविताच करतोस का रे?"
आणि मी स्वतःत डोकावून पाहिलं,
आठवणींच्या खोल तळाशी जाऊन, अपूर्ण राहिलेल्या दोन्ही कवितांना कवटाळलं...

एक लिहून खोडलेली,
दुसरी चिडून फाडलेली...
त्यानंतर मला आठवत नाही; एकही कविता सुचलेली,
कुणासाठी लिहिलेली, कुणापर्यंत पोचलेली...
-हर्षल (२३/१२/१३ - रा. १०.४०)

९.५.१३

आयुष्य असं असतं...

कसं जगायचं, कसं जगायचं,
हे कुणालाच माहीत नसतं...
उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं...
आयुष्य असं असतं...

जगतांना फक्त जगायचं असतं...
एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं...
हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून चालायचं असतं...
कळलेलं, कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं...
आयुष्य असं असतं...

देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं...
दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं...
साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं...
कधी मैफल रंगलेलं, कधी खूप मरगळलेलं...
आयुष्य असं असतं...

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं...
प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं...
गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण होऊन सावरलेलं...
आयुष्य असं असतं...
 
आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं...
स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं...
प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,
आयुष्य असंच असतं...
आयुष्य असंच असतं...
-------------------------------------------------------------------------------------------
-हर्षल(२३/०३/२०१०-सायं ५.४०)
मायबोलीवर पूर्वप्रकाशीत 

१५.४.१३

दोन मी...


जरी खुले आकाश मला,
कळे न; जावे कुण्या दिशेला,
गुंतत जातो स्वतःत मग मी,
शोधत बसतो स्वतःस मग मी...

देत जगाला तोंड एक तो,
दुसरा शोधे जगी कोण मी?
कुणास नाही ठाऊक माझे,
माझ्यामधले असे दोन मी...
-----------------------------------------
हर्षल (१४/४/१३ - सायं. ७.४५)

४.४.१३

वसंता तुझ्या येण्याने...

वसंता तुझ्या येण्याने, फार न काही बदलले,
पक्षी मुक्त जाहले आणि वृक्ष जरी अन् मोहरले...

रूक्ष उन्हाचा असह्य चटका, काहिली करे अंगांची,
जाळून आलो दुर्गुण, केली उधळण जरी अन् रंगांची...

वणवण करिती बांधव माझे, दोन घोट पाण्यासाठी,
लाख घोषणा कुणी करो, म्हणो देश जरी अन् त्यांपाठी...

अता न सुचती कविता मजला, आईच तेव्हा आठवते,
डोळ्यांमधले पाणी सुद्धा, पळीत जरी अन् साठवते...

..........................................................

वसंता तुला एक मागणे, नियम मोडून देशील का?
आगमनाच्या आनंदाला, पाऊस घेऊन येशील का?
--------------------------------------------
हर्षल (४/४/२०१३ - दु. १.००)

२५.३.१३

नसतेस ऑनलाईन तू...


नसतेस ऑनलाईन तू, इंट्रेस्टच निघून जातो,
तुजवीण कुणी आवडेना, पण ऑप्शन पाहून घेतो...

येतो मी फेसबूकवरती, बोलण्या तुझ्याशी काही,
असतेस ऑफलाईन तू, मज काही समजत नाही,
मग दोनदोनदा तुझ्या त्या, प्रोफाईलवरती जातो,
अन् प्रोफाईलच्या पिकला, मी तासन् तास पहातो...

दिसतात तुझ्या अपडेट, कोपर्‍यात उजव्या जेव्हा,
आहेस ऑनलाईन तू, हे कळते मजला तेव्हा,
पण चॅटींगसाठी तुजला का भाव गडे लागतो?
क्षणभर बोलायासाठी, मी रात्रभर जागतो...

तू तरीही बोलत नाही, काहीही सांगत नाही,
वाटे जरी "खूपच झाले", तरी वाट बघत मी राही...
या फेसबूकाचासुद्धा, आता कंटाळा येतो,
काहीही मिळकत नाही, पण त्रास फुकाचा होतो...

एवढे करूनही जेव्हा, मज तुझी आठवण येते,
ना राहवून ती मजला, मग येथे घेऊन येते,
नवनवीन पाखरांचा, मज पत्ता मिळूनी  जातो,
क्षणभर का होईना मी, अन् तुलाच विसरून जातो...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२५/३/२०१३ - रात्रौ. ११.२०)

१६.२.१३

नि:शब्द प्रेम माझे...

पैशात फार थोड्या भागेल एक दिवशी,
प्रेमात सर्व आहे, समजेल एक दिवशी...

दु:खास अंत नाही, समजून वाग ना तू,
सुख भोगण्याची तर्‍हा, बदलेल एक दिवशी...

सांभाळ तू घराला, अंधार मी पहातो,
समई उजेड देती, गवसेल एक दिवशी...

नि:शब्द प्रेम माझे, सांगू कसे तुला मी?
विसरावयास दैन्य, विनवेल एक दिवशी...

आहे जरी कफल्लक, दिलदारही मी आहे,
जागा तुझ्या मनी मी मिळवेल एक दिवशी...

आभाळ फाटलेले, दे हात तू जरासा,
लढतोय एकट्याने, उसवेल एक दिवशी...
---------------------------------------------------------------
हर्षल (१६/२/१३ - रात्रौ. १०.३५)
---------------------------------------------------------------