नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

८.५.१५

"नाटक परीचय : 'अ'फेअर डील"

....................आजच्या वीस - बावीस वर्षांच्या तरुणांना प्रेम म्हणजे काही भव्यदिव्य वाटत नसतं. या वयात येईपर्यंत, बर्‍याच होतकरू आणि प्रायोगिक प्रेमप्रकरणांचे ते प्रमुख सल्लागार बनलेले असतात. अशीच एक तरूणी, जी कायम प्रेमात पडत असते, आणि तिचे उठसूट ब्रेकअपही होत असतात, ती या नाटकाची प्रोटॅगोनिस्ट आहे. नाही, हे नाटक तिच्या अफेअर्स विषयी जरी सारखं सारखं भाष्य करून तरुणांना प्रेमाबद्दल डोस पाजत असलं, तरी एक्झॅक्ट्ली त्याबद्दल नाहीये. ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून एक नाटकातलं नाटक लिहितीये, त्यातल्या चाळीशी पार केलेल्या जोडप्याच्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरबद्दल आहे. लेखक/दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे, यांचं हे नवीन नाटक, ज्यात आनंद इंगळे, मंजुषा गोडसे आणि मृण्मयी देशपांडे, सौरभ गोगटे आणि नचिकेत देवस्थळी यांच्या भुमिका आहेत.
....................या नाटकाची सुरुवात होते निकिता (मृण्मयी)च्या अफेअरने. तिने नाटक लिहिण्याचा घाट का घातलाय, ती कशी अवखळ कॉलेज तरुणी आहे वगैरे वगैरे मृण्मयीने छान बेअरींग घेतलंय. तिच्या नाटकातले चाळीशी ओलांडलेले जोडपे म्हणजे मंदार (आनंद) आणि देवयानी (मंजुषा). आपला नवरा सतत पैसा कमवण्याच्या नादात आपल्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणुन एक गुरू नावाच्या माणसाशी देवयानीचं लग्नबाह्य अफेअर सुरू असतं. हे अफेअर त्या जोडप्याला असणार्‍या मुलीला कळतं, आणि ती आपल्या बाबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणुन प्रयत्न करते. दुसरीकडे तिच्या बाबाचं त्या अफेअरला काहीच हरकत नसणं, तो तिसरा व्यक्ती सर्रास घरात बाबासमोर येणं, आई-बाबांचं एकमेकांशी असलेलं अगदी मोकळीकीचं वागणं, आणि या सर्वांमुळे चक्रावून गेलेल्या त्या मुलीच्या वयानुसार गोंधळून जाणं, आणि मग ह्या सगळ्याची कारणमीमांसा करून शेवटाकडे सगळं छान, सुरळीत होणं हे सगळं या नाटकात आलंच. पण विषयाचा अवाका मात्र, प्रेम आणि पैसा, यांच्यातल्या 'महत्त्वा'बाबतचं द्वंद्व, तरुणांचं प्रेम आणि लग्न, लग्नबाह्य संबंधांची गरज का पडू शकते, आणि तरूणांनी प्रेम करावं म्हणजे नक्की कसं करावं, करावं की करू नये, असा आहे. यात अफेअर असं खूप काही नाहीये, याचा उलगडा उत्तरार्धात होतो.
....................नाटक म्हटलं की, अनपेक्षित गोष्टींनी रंगमंचावर अवतरणं अपेक्षित असतं. या नाटकांतल्या घटना अतर्क्य आहेत, पण अशक्य नाहीत. त्या खरंच घडू शकतात. वयात आलेल्या मुलांना आपल्या पालकांपेक्षा आपल्या मित्रांवर जास्त भरवसा असतो. डोक्यात संशयांचे काहूर माजले, की त्यांची बुद्धी नको तितकी वेगवान धावू शकते. ती धावली की त्यांना समजणारही नाही, परंतू त्यांचे नुकसान करेल अशा गोष्टी घडत जातात. सुखवस्तू घरातली ही मुलगी आपल्या आईची डायरी वाचून, त्यात लिहिलेल्या गोष्टींवरून आपल्या आईचं कुणाशी तरी अफेअर आहे, मग तो माणूस कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या बाबाला प्रत्यक्षपणे सांगता येत नाही म्हणून अज्ञात बनून कळवते. नाटकातला बाबा हा सगळं माहीत असुनही, सगळं निमूटपणे पाहणारा, उलट आपल्या बायकोच्या अफेअरबद्दल कळवणार्‍या व्यक्तीलाच ठणकावून सांगणारा, आणि कुठलाही संशय न घेणारा दाखवलाय. यात त्याचा काय फायदा, किंवा त्याचं स्वतःचही कुठे बाहेर अफेअर असल्याचा संशय निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. नाटकातली आई, ही खरंच इतकी उथळ स्वभावाची स्त्री आहे का? ती नाहीचे, पण तरीही एका परपुरूषाबरोबर ती अगदी सहज कशी काय वागते/मोकळी होते? तिला बाबाने दिलेल्या मोकळीकीचा ती गैरफायदा घेतेय आणि तरीही ती इतकी सहज कशी घरात वावरते? हे सगळं नाटकात होतं
....................या नाटकाचा गाभा म्हणता येईल, ते म्हणजे लग्नानंतर बदलत जाणार्‍या आयुष्यावरचं भाष्य. पुरूष लग्न झाल्यानंतर पैसा कमवणे ह्या मुख्य जबाबदारीसाठी हळुहळू कमी प्रेमळ, कमी भावनाशील होऊन जास्त प्रॅक्टीकल होऊ लागतो. स्त्रीसुद्धा मुल झालं की तिच्या विश्वातून तिची लग्नाआधीची प्रेयसी जाऊन केवळ आई उरते. वेळ जातो तसा नात्यांला म्हातारपण येऊ लागतं. आणि चाळीशीमध्ये जेव्हा सर्व सुखं उपभोगून झाली असतात, सर्व सुखसोयींची पूर्तता झालेली असते, तेव्हा स्त्रीला आपल्या पतीकडून तशाच प्रेमाची ओढ लागते. पण पुरूषाची मात्र मानसिकता पूर्ण पैशाळू झालेली असते. सर्व कळत असूनही त्याला आपल्या वर्तमानाची घडी मोडू न देता, भविष्याच्या सुरक्षिततेसाठी कायम राबावंच लागणार असतं. त्यात वाढलेल्या जबाबदार्‍यांनी तो दबलेला असतो. (यांत स्त्री ही केवळ गृहीणी आहे हेच कसं लेखकाने गृहीत धरलंय, हे नाटक स्वातंत्र्य...) त्यामुळे ती स्त्री स्वतःला रमवण्यासाठी कशाचा आधार घेऊ शकते यावर अफेअर डील घडतं. दुसरं महत्त्वाचं भाष्य म्हणजे, तरूण मुला मुलींची प्रेमप्रकरणं. ती लोणच्यासारखी मुरत तर नाहीच, पण कच्च्या कैर्‍यांना मिटक्या मारून खाऊन टाकून, कोयी फेकून देणार्‍यांसारखी असतात. मजा गेली, की नवीन. क्षणांत हे, तर क्षणांत ते. जोडीला व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकचा उल्लेख केला की झालं नाटक आजच्या काळातलं. प्रेम क्षणभंगूरच आहे, हे आजच्या जनरेशनने आधीच मान्य करून मोकळे झाल्यामुळे, एखादी गोष्ट हातात आली नाही तर दु:खी व्हायची काही आवश्यकता नाही. नेक्स्ट टाईम, नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी म्हणत ते रेडी होतात. पण हातात न आलेल्या गोष्टीचं जेवढं दु:ख मोठं, तेवढंच ती गोष्ट मिळाल्यानंतरचा समाधानही तितकंच मोठं, हे प्रेमाच्या बाबतीत आता किती खरं उरलंय, हे या नाटकातून समोर येतं.
....................राजन भिसे यांचं छान नेपथ्य, नरेंद्र भिडेंचं संगीत उत्तम. प्रकाशयोजनाही अपेक्षेप्रमाणेच. पूर्वार्ध उत्कंठावर्धक, तर उत्तरार्धात मात्र प्रेमाबद्दल अतिडोस होतो की काय अशी भिती वाटते. सगळी मुरलेली कलाकार मंडळी असल्यामुळे अगदी अभिनयक्षमतेची जोखणी होत नाही, कारण इथे कुठलेही धक्के बसत नाहीत. सगळं सहजतेने होतं, पण प्रेडीक्टेबल (प्रेडीक्ट करण्याची सवय झाली असल्यामुळे कदाचित...) आहे. कॉर्पोरेटमधलं पॉलिटीक्स हा एक साईडलाईन ट्रॅक आहे, पण तो खूपच अल्लड तर्‍हेने मांडलाय. (माझं वैयक्तिक मत). एकदा पहायला हरकत नाही. कारण काही काही पंच लाईन्स तंतोतंत खर्‍या आहेत.

तळटीप : बालगंधर्व रंगमंदीर एसी असलं, तरी डास खूप चावले. तेवढं 'नॉट फेअर'...

- हर्षल (८/५/१५ - पहाटे २.५०)

२९.७.१३

नाटक परीचय : "येरे येरे पैसा"...

इंजिनीअरींगच्या दुसर्‍या वर्षाला असतांना, माझ्या कॉलेजने, "सीओईपी"ने सादर केलेल्या "समेवर टाळी" या एकांकीकेला २००७ साली फिरोदीया करंडक मिळाला होता. अर्थात, मी त्यात काहीही केलं नव्हतं. पण एक सच्चा सीओईपीअन् म्हणून, कॉलेज संपून चार वर्ष झाली तरीही, "ते जगलेले दिवस..." पुन्हा आठवले, की ताजंतवानं होऊन रोजच्या रहाटगाडग्याला जुंपून घ्यायची ताकद मिळते.

ह्या सगळयाची आठवण यावी असं एक व्यावसायीक नाटक, आज रात्री पाहीलं. औंधमध्ये नव्याने सुरू झालेल्या पंडीत भीमसेन जोशी नाट्यमंदीरात रविवारी २८ जुलै रोजी, रात्री ९.३० वाजता, संजय मोने लिखीत "येरे येरे पैसा" हे नवं डान्सिकल (हा त्यांचाच शब्द) आणि म्युजिकल नाटक सादर झालं. तेजस्वीनी पंडीत हिला रंगभूमीवर पहिल्यांदाच पहायला मिळणार म्हणून आणि घराच्या जवळच नाट्यगृह होतं म्हणूनही हे नाटक पहायचं होतं. तिच्या बरोबर नाटकात अभिजीत खांडकेकर, शेखर फडके आणि सायली मराठे यांच्या भुमिका आहेत. आणि संगीत निलेश मोहरीर यांचं आहे.

आपण जन्माला का आलो? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा शोध घेतो. शाळा, कॉलेज, प्रेम आणि लग्न, नोकरी, घर-दार, बंगला, गाडी, स्टेटस, मुलं आणि त्यांची शिक्षणं, रीटायर्ड झाल्यावर आपण कुणावर अवलंबून राहू नये म्हणून आणि केवळ म्हणूनच... आपण जवळपास सगळेच याच ठरावीक मार्गाने जाणारे प्रवासी, आणि ह्या प्रवासाला अगदी निर्धास्तपणे पार करता येण्याचं साधन म्हणजे पैसा... अनंत काळापासून पडलेल्या या प्रश्नाला उत्तर म्हणून बर्‍याच लोकांचं, कुठल्याही काळात जा, "आपण पैसा कमवण्यासाठी जन्माला आलोय" हे उत्तर नसेल, तर नवल!!!

मग तो पैसा किती कमवायचा? कुणासाठी कमवायचा? कमावलेल्या पैशाचा उपभोग कधी आणि कसा घ्यायचा? पैसा कसा मिळवायचा? त्याच्यासाठी किती खस्ता खायच्या? बरं, किती पैसा कमावला म्हणजे आपल्याला आयुष्य हवं तसं जगता येईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं कधीच कुठल्याच पैसे कमवणार्‍या माणसाने आधीच विचार करून ठेवलेली नसतात. मग त्याचे जसे चांगले परीणाम होतात, तसेच दुष्परीणामही होतात. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि हा विषय मी जन्माला आलो नव्हतो त्याआधीही अस्तित्वात होताच. मग या नाटकात नवीन असं काय? असा प्रश्न मी स्वतःला विचारला नाही. विषय जुनाच, पण नाटक कसं वेगळं होऊ शकतं हे "येरे येरे पैसा..."च्या सादरीकरणातून जाणवतं. जसा एखादा चित्रपट आपण वन टाईम वॉच म्हणतो, तसं हे नाटकही वन टाईम वॉच आहे...

नाटकात दोन सुत्रधार (शेखर आणि सायली) आहेत. ते नाटक शेवटापर्यंत नेतात. आणि मधल्या वेगवेगळ्या भुमिकाही अगदी सहज करतात. गोष्ट अभिजीत आणि तेजस्वीनीची आहे. कॉलेजमध्ये भेटतात आणि प्रेम जुळतं. पण तो बुजरा, ती बबली गर्ल. मग त्याने तिला घाबरत घुबरत विचारणं, तिलाही तो आवडतंच असतोच, पण मुलांनीच 'पहिलं पाऊल' टाकावं अशी अट, मग शेवटी होकार. आता आजच्या काळात संपर्काची साधनं म्हणजे मोबाईल, फेसबूक, लाईक, कमेंट आणि ऑनलाईन लाईन मारणं या सगळ्यावर कमेंट न केली तर नाटक आजच्या काळातलं आहे हे समजायला लहान मुलांना तरी वेळ लागतो आजकाल. असो. मग, ती दारू पिऊन घरी येते म्हणजे मॉडर्न मुलगी, तिची आई फार्मविलेवरून ७०० किलो बटाटे विकते म्हणजे टेक्नोसॅव्ही, आणि बाबा फेसबूकच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर कोटी करून खर्‍या शेतकर्‍यांच्या परिस्थितीवर भाष्य करतात (आयफोन, आयपॅड आणि 'आय पेड' फॉर इट वाली लाचारी). मग तो घरी येतो. बोलणी आणि पुढे रीतसर लग्न वगैरे लागतं आणि मुलगी सासरी जाते. संसार सुरू होतो. आणि मग इथून पुढे खरं या नाटकाचं नाव सार्थ ठरावं असं नाटक सुरू होतं.

ऑफिसमधली डिमांडींग (चालू/त्रासदायक/सेक्षुअली हरास सुद्धा करू शकणारी {हा बॉसचा प्रकार पुरूषाच्या नशीबी क्वचितच असेल...}) बॉस, कामाच्या डेडलाईन्स, वर्क प्रेशर, मग उशीरा घरी येणं, बायकोची तक्रार, मग मुलीच्या काळजीपोटी सासू-सासर्‍यांनी जावयाला समजावू पाहणं... फ्रस्ट्रेशन, ते विसरण्यासाठी दारू-पार्ट्या आणि त्या पार्ट्यांमध्येही त्याच समस्यांनी पछाडलेल्या लोकांची भेट... मग मध्यांतरापर्यंत या जोडप्याला त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या यासाठी ईश्वरी कृपेने १५ कोटी रूपयांची लॉटरी लागते. पुढे, ते युरोप ट्रीप करतात. मग उरलेल्या पैशाची गुंतवणूक करतात. मग तो स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. आणि गुंतत गुंतत जातो. ती एकटी एकटी पडत जाते. पैसा पैसा करत तो बंगला, महाल, सोयी सुविधा, खरेदी करत जातो, आणि ती त्याच्याविना कंटाळून मग स्वतः काम करायला लागते... या नाटकाचा शेवट म्हणजे, तिचं काम करतांना, ती घसरून पडते आणि होणारं मूल दगावतं... पुढे काय होतं, नाटकाचा शेवट हा असाच शोकांत आहे की सुखांत की धक्कातंत्र... हे सगळं नाटक पाहून आपलं आपण ठरवायचं.

हे नाटक म्युजिकल आहे, त्यात गाणी, त्यांवर नाच. पण सुरूवातीचा अर्धा तास एकापाठोपाठ भडीमार होतो तेव्हाच फक्त थोडं नको वाटतं. पण नेपथ्य चांगलंय. व्हिजुअल प्रोजेक्शन्स आहेत, त्यामुळे नाटकातही टेक्नॉलॉजी वापरता येते हे दाखवण्यापुरतं वापरलंय. संवाद, अभिनय सर्वांचाच उत्तमच आहे. शेखर फडके विशेष वाटतो, त्याच्या या नाटकातल्या वैविध्यपूर्ण अभिनयामुळे. नाटकाचा दहावाच प्रयोग होता, त्यामुळे सगळेच कलाकार किमान एकदा तरी संवाद म्हणतांना अडखळले.

आता थोडीशी चीरफाड : आजकाल सर्वच क्षेत्रात कामाच्या वेळा अजिबात ठरलेल्या उरल्या नाहीयेत. खुद्द अभिनय क्षेत्रात रात्री ९.३० च्या प्रयोगासाठी, रोजच्या मालिकांच्या शूटींगसाठी, प्रवास आणि दौरे या सर्वांमुळे कलाकार मंडळींनाही पैशासाठी अहोरात्र काम करावेच लागते. त्यामुळे या नाटकातला नायक आयटी इंजिनीअरच का दाखवलाय, माहित नाही. बरं, आयटीबद्दल जुजबी माहिती वापरून नाटकाची थीम पोचवण्याचा प्रयत्न अपूरा आहे. म्हणजे, आयटी किंवा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स केवळ माहिती गोळा करण्याचं आणि ती पुरवण्याचं काम करतात असा समज आहे. खूप त्रोटक विचार आणि अभ्यास. नायक, बीई कंप्यूटर आणि नायिका आर्किटेक्ट. मग ती कुठल्या कॉलेजमध्ये एकत्र शिकतात? (अकरावी-बारावी सायन्स मान्य... नाटक-स्वातंत्र्य असं नाव देऊया...) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सुत्रधार सांगतात की आता दोघेही आपापल्या कामांमध्ये इतके बिजी झालेत की ते दोघेही एकमेकांना व्हिडिओ चॅटद्वारे भेटतात, बोलतात... तर मग लगेच, त्याच क्षणाला नायिकेला ओकारी येऊन ती आई होणारे असं डिक्लेअर करतात... (किडा वळवळलाच...)

'समेवर टाळी' ह्या एकांकीकेत पैसा ही थीम नव्हती, तर मन आणि बुद्धी यांतलं द्वंद्व ही होती... पण काही काळापुरतं तरी मला आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटला की त्यांनी कितीतरी आधीच या विषयावर एक कलाकृती निर्माण करून 'फिरोदीया' करंडक जिंकला होता. समेवर टाळी

नाटक पहाणं, ही आवड असते. ती असली, की कुठलंही नाटक पहाणेबलच असतं. त्यामुळे आवडवाले लोकहो, पहा एकदा.

हर्षल (२९/७/१३ - स. ३. ३०)