२९.७.१३

नाटक परीचय : "येरे येरे पैसा"...

इंजिनीअरींगच्या दुसर्‍या वर्षाला असतांना, माझ्या कॉलेजने, "सीओईपी"ने सादर केलेल्या "समेवर टाळी" या एकांकीकेला २००७ साली फिरोदीया करंडक मिळाला होता. अर्थात, मी त्यात काहीही केलं नव्हतं. पण एक सच्चा सीओईपीअन् म्हणून, कॉलेज संपून चार वर्ष झाली तरीही, "ते जगलेले दिवस..." पुन्हा आठवले, की ताजंतवानं होऊन रोजच्या रहाटगाडग्याला जुंपून घ्यायची ताकद मिळते.

ह्या सगळयाची आठवण यावी असं एक व्यावसायीक नाटक, आज रात्री पाहीलं. औंधमध्ये नव्याने सुरू झालेल्या पंडीत भीमसेन जोशी नाट्यमंदीरात रविवारी २८ जुलै रोजी, रात्री ९.३० वाजता, संजय मोने लिखीत "येरे येरे पैसा" हे नवं डान्सिकल (हा त्यांचाच शब्द) आणि म्युजिकल नाटक सादर झालं. तेजस्वीनी पंडीत हिला रंगभूमीवर पहिल्यांदाच पहायला मिळणार म्हणून आणि घराच्या जवळच नाट्यगृह होतं म्हणूनही हे नाटक पहायचं होतं. तिच्या बरोबर नाटकात अभिजीत खांडकेकर, शेखर फडके आणि सायली मराठे यांच्या भुमिका आहेत. आणि संगीत निलेश मोहरीर यांचं आहे.

आपण जन्माला का आलो? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा शोध घेतो. शाळा, कॉलेज, प्रेम आणि लग्न, नोकरी, घर-दार, बंगला, गाडी, स्टेटस, मुलं आणि त्यांची शिक्षणं, रीटायर्ड झाल्यावर आपण कुणावर अवलंबून राहू नये म्हणून आणि केवळ म्हणूनच... आपण जवळपास सगळेच याच ठरावीक मार्गाने जाणारे प्रवासी, आणि ह्या प्रवासाला अगदी निर्धास्तपणे पार करता येण्याचं साधन म्हणजे पैसा... अनंत काळापासून पडलेल्या या प्रश्नाला उत्तर म्हणून बर्‍याच लोकांचं, कुठल्याही काळात जा, "आपण पैसा कमवण्यासाठी जन्माला आलोय" हे उत्तर नसेल, तर नवल!!!

मग तो पैसा किती कमवायचा? कुणासाठी कमवायचा? कमावलेल्या पैशाचा उपभोग कधी आणि कसा घ्यायचा? पैसा कसा मिळवायचा? त्याच्यासाठी किती खस्ता खायच्या? बरं, किती पैसा कमावला म्हणजे आपल्याला आयुष्य हवं तसं जगता येईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं कधीच कुठल्याच पैसे कमवणार्‍या माणसाने आधीच विचार करून ठेवलेली नसतात. मग त्याचे जसे चांगले परीणाम होतात, तसेच दुष्परीणामही होतात. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि हा विषय मी जन्माला आलो नव्हतो त्याआधीही अस्तित्वात होताच. मग या नाटकात नवीन असं काय? असा प्रश्न मी स्वतःला विचारला नाही. विषय जुनाच, पण नाटक कसं वेगळं होऊ शकतं हे "येरे येरे पैसा..."च्या सादरीकरणातून जाणवतं. जसा एखादा चित्रपट आपण वन टाईम वॉच म्हणतो, तसं हे नाटकही वन टाईम वॉच आहे...

नाटकात दोन सुत्रधार (शेखर आणि सायली) आहेत. ते नाटक शेवटापर्यंत नेतात. आणि मधल्या वेगवेगळ्या भुमिकाही अगदी सहज करतात. गोष्ट अभिजीत आणि तेजस्वीनीची आहे. कॉलेजमध्ये भेटतात आणि प्रेम जुळतं. पण तो बुजरा, ती बबली गर्ल. मग त्याने तिला घाबरत घुबरत विचारणं, तिलाही तो आवडतंच असतोच, पण मुलांनीच 'पहिलं पाऊल' टाकावं अशी अट, मग शेवटी होकार. आता आजच्या काळात संपर्काची साधनं म्हणजे मोबाईल, फेसबूक, लाईक, कमेंट आणि ऑनलाईन लाईन मारणं या सगळ्यावर कमेंट न केली तर नाटक आजच्या काळातलं आहे हे समजायला लहान मुलांना तरी वेळ लागतो आजकाल. असो. मग, ती दारू पिऊन घरी येते म्हणजे मॉडर्न मुलगी, तिची आई फार्मविलेवरून ७०० किलो बटाटे विकते म्हणजे टेक्नोसॅव्ही, आणि बाबा फेसबूकच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर कोटी करून खर्‍या शेतकर्‍यांच्या परिस्थितीवर भाष्य करतात (आयफोन, आयपॅड आणि 'आय पेड' फॉर इट वाली लाचारी). मग तो घरी येतो. बोलणी आणि पुढे रीतसर लग्न वगैरे लागतं आणि मुलगी सासरी जाते. संसार सुरू होतो. आणि मग इथून पुढे खरं या नाटकाचं नाव सार्थ ठरावं असं नाटक सुरू होतं.

ऑफिसमधली डिमांडींग (चालू/त्रासदायक/सेक्षुअली हरास सुद्धा करू शकणारी {हा बॉसचा प्रकार पुरूषाच्या नशीबी क्वचितच असेल...}) बॉस, कामाच्या डेडलाईन्स, वर्क प्रेशर, मग उशीरा घरी येणं, बायकोची तक्रार, मग मुलीच्या काळजीपोटी सासू-सासर्‍यांनी जावयाला समजावू पाहणं... फ्रस्ट्रेशन, ते विसरण्यासाठी दारू-पार्ट्या आणि त्या पार्ट्यांमध्येही त्याच समस्यांनी पछाडलेल्या लोकांची भेट... मग मध्यांतरापर्यंत या जोडप्याला त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या यासाठी ईश्वरी कृपेने १५ कोटी रूपयांची लॉटरी लागते. पुढे, ते युरोप ट्रीप करतात. मग उरलेल्या पैशाची गुंतवणूक करतात. मग तो स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. आणि गुंतत गुंतत जातो. ती एकटी एकटी पडत जाते. पैसा पैसा करत तो बंगला, महाल, सोयी सुविधा, खरेदी करत जातो, आणि ती त्याच्याविना कंटाळून मग स्वतः काम करायला लागते... या नाटकाचा शेवट म्हणजे, तिचं काम करतांना, ती घसरून पडते आणि होणारं मूल दगावतं... पुढे काय होतं, नाटकाचा शेवट हा असाच शोकांत आहे की सुखांत की धक्कातंत्र... हे सगळं नाटक पाहून आपलं आपण ठरवायचं.

हे नाटक म्युजिकल आहे, त्यात गाणी, त्यांवर नाच. पण सुरूवातीचा अर्धा तास एकापाठोपाठ भडीमार होतो तेव्हाच फक्त थोडं नको वाटतं. पण नेपथ्य चांगलंय. व्हिजुअल प्रोजेक्शन्स आहेत, त्यामुळे नाटकातही टेक्नॉलॉजी वापरता येते हे दाखवण्यापुरतं वापरलंय. संवाद, अभिनय सर्वांचाच उत्तमच आहे. शेखर फडके विशेष वाटतो, त्याच्या या नाटकातल्या वैविध्यपूर्ण अभिनयामुळे. नाटकाचा दहावाच प्रयोग होता, त्यामुळे सगळेच कलाकार किमान एकदा तरी संवाद म्हणतांना अडखळले.

आता थोडीशी चीरफाड : आजकाल सर्वच क्षेत्रात कामाच्या वेळा अजिबात ठरलेल्या उरल्या नाहीयेत. खुद्द अभिनय क्षेत्रात रात्री ९.३० च्या प्रयोगासाठी, रोजच्या मालिकांच्या शूटींगसाठी, प्रवास आणि दौरे या सर्वांमुळे कलाकार मंडळींनाही पैशासाठी अहोरात्र काम करावेच लागते. त्यामुळे या नाटकातला नायक आयटी इंजिनीअरच का दाखवलाय, माहित नाही. बरं, आयटीबद्दल जुजबी माहिती वापरून नाटकाची थीम पोचवण्याचा प्रयत्न अपूरा आहे. म्हणजे, आयटी किंवा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स केवळ माहिती गोळा करण्याचं आणि ती पुरवण्याचं काम करतात असा समज आहे. खूप त्रोटक विचार आणि अभ्यास. नायक, बीई कंप्यूटर आणि नायिका आर्किटेक्ट. मग ती कुठल्या कॉलेजमध्ये एकत्र शिकतात? (अकरावी-बारावी सायन्स मान्य... नाटक-स्वातंत्र्य असं नाव देऊया...) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सुत्रधार सांगतात की आता दोघेही आपापल्या कामांमध्ये इतके बिजी झालेत की ते दोघेही एकमेकांना व्हिडिओ चॅटद्वारे भेटतात, बोलतात... तर मग लगेच, त्याच क्षणाला नायिकेला ओकारी येऊन ती आई होणारे असं डिक्लेअर करतात... (किडा वळवळलाच...)

'समेवर टाळी' ह्या एकांकीकेत पैसा ही थीम नव्हती, तर मन आणि बुद्धी यांतलं द्वंद्व ही होती... पण काही काळापुरतं तरी मला आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटला की त्यांनी कितीतरी आधीच या विषयावर एक कलाकृती निर्माण करून 'फिरोदीया' करंडक जिंकला होता. समेवर टाळी

नाटक पहाणं, ही आवड असते. ती असली, की कुठलंही नाटक पहाणेबलच असतं. त्यामुळे आवडवाले लोकहो, पहा एकदा.

हर्षल (२९/७/१३ - स. ३. ३०)

९.५.१३

आयुष्य असं असतं...

कसं जगायचं, कसं जगायचं,
हे कुणालाच माहीत नसतं...
उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं...
आयुष्य असं असतं...

जगतांना फक्त जगायचं असतं...
एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं...
हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून चालायचं असतं...
कळलेलं, कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं...
आयुष्य असं असतं...

देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं...
दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं...
साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं...
कधी मैफल रंगलेलं, कधी खूप मरगळलेलं...
आयुष्य असं असतं...

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं...
प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं...
गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण होऊन सावरलेलं...
आयुष्य असं असतं...
 
आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं...
स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं...
प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,
आयुष्य असंच असतं...
आयुष्य असंच असतं...
-------------------------------------------------------------------------------------------
-हर्षल(२३/०३/२०१०-सायं ५.४०)
मायबोलीवर पूर्वप्रकाशीत 

२५.४.१३

पुन्हा हात हाती धरू एकदा...

पुन्हा हात हाती धरू एकदा,
'कुणी' जिंकण्यासी, हरू एकदा...

जरी वय न झाले, मनाचे तरी,
कसे छेडले तू, स्मरू एकदा...

तुझा उंबरा लांघला रे सख्या;
पुन्हा माप ते चल भरू एकदा...

कधी सोडला हात धुंदीमध्ये,
जरा दु:ख त्याचे करू एकदा...

जगत राहिलो एकमेकांमुळे,
अता त्याचसाठी मरू एकदा...
==========================
हर्षल (२५/४/२०१३ - दु. २.००)

२१.४.१३

थोडंसं मनातलं...

........................संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर, केवळ भुकेचे विचार डोक्यात घोळत राहतात. एरव्ही सुद्धा डोकं फार ताळ्यावर राहतं अशातला काही भाग नाही. पण त्या दिवशी ऑफिसमधल्या टेन्शनचा भार डोक्यावर घेऊन निघालो होतो. खूप असं नाही, पण होतं तेवढंच पुरेसं आणि नकोसं होतं.
........................येरवडा ते पुणे स्टेशनच्या पीएमटीमध्ये बसल्यानंतर, मी माझ्याच विचारांत गुंतलो होतो. आजुबाजूला फक्त गोंधळ ऐकू येत होता. मी ते सगळं ऐकून घेत होतो, त्यातही मनातले आवाज अजून डोकं बधीर करत होते. सेंट्रलला त्या बसमध्ये ती 'चौघं' बसली. अर्थात उभी राहिली; कारण 'आम्ही' जागा व्यापलेल्या होत्या. त्यांचं एकमेकांशी अगदी हसत-खेळत संभाषण चाललं होत. ते काय बोलतायेत याकडे कुणाचं किती लक्ष होतं मलाही ठाऊक नाही. कारण प्रत्येकजण माझ्यासारखाच कुठल्या न कुठल्या विचारांत, कुणाशी बोलण्यांत मग्न होता. बस ट्रॅफीकमधून वाट काढत जात होती.
........................पण तेवढ्या वेळात हळुहळू सार्‍यांचं लक्ष त्या चौघांच्या बोलण्याकडे जायला लागलं. कुणाचं कौतुकाने, कुणी थट्टेने त्यांच्याकडे पहायला लागले. ती चौघं त्यांच्याच जगात हरवलेली होती. एकमेकांशी हातवारे करुन बोलणारी ती अगदी मनमोकळेपणानं; बसमधल्या गर्दीत आपण उभे आहोत याची पर्वा न करता अगदी सहज एकमेकांशी संवाद साधत होती.
........................ माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं, ते ही लोकं नक्की का अशी हातवारे करून बोलताय; आणि संपूर्ण बसमधल्या गोंधळाचा; गर्दीचा त्यांना काहीच कसा फरक पडत नाहीए या विचारामुळे. ती बोलत होती, पण तिथे शब्द नव्हते; हसत होती पण त्या हसण्याला आवाज नव्हता. खिडकीबाहेर धो-धो पाऊस पडावा; पण आपल्याला त्याचा आवाजही येऊ नये; पडणारी प्रत्येक सर आपल्याला ये-ये म्हणुन बोलावतेय आणि तरीही जाता येऊ नये, अशा त्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद ती चौघंच घेऊ शकत होती. त्यावेळी माझ्या मनात एक निर्वात पोकळी तयार झाल्यासारखी मला वाटलं. माझ्या डोक्यातले विचार तोपर्यंत कुठेतरी लांब निघून गेले होते.
........................ आणि मी फक्त त्यांच्या चेहेर्‍यावरच्या निर्मळ आनंदाकडे पाहत होतो. अगदी थोडाच वेळ; मी बसमधून उतरेपर्यंतच मला तो आनंदाचा पाऊस अनुभवता आला. पण त्यात भिजून मला अगदी मोकळं झाल्यासारखं वाटलं. शब्द बोलता येतात; ऐकू येतात; पण त्यांना आजूबाजूच्या समान लोकांसमोर व्यक्त करतांना दहा वेळा अगम्य दुनियेच्या रीती-रिवाजांचा विचार करणारे आपण. आणि एक शब्दही न बोलता हवा तो अर्थ; हवी ती भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य असलेली ती चौघं मला माझ्यापेक्षाही कितीतरी भाग्यवान वाटली. ती एकमेकांच्या हृदयाची भाषा बोलत होती असं मला वाटलं.
........................ आणि मला मात्र माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी किती शब्द वेचावे लागतात?
 

१७.४.१३

काळ आहे लोटला...

जाहली पोटामध्ये गलबल इथे,
चालला आहे कशाचा खल इथे?

थेंब पाण्याचा मिळेना दूरवर,
वाहतो डोळ्यांतुनी बादल इथे...

हुकुमशाहीचा म्हणे धिक्कार अन्,
वागणे यांचे जसे मोघल इथे...

माजले नेतेच दरवेशापरी,
नाचते जनता जसे अस्वल इथे...

सोड कागाळ्या जगाच्या बैस रे,
मागवू आपण चहा स्पेशल इथे...

काळ आहे लोटला, विसरून जा,
दु:खही भासे नवे 'हर्षल' इथे...
--------------------------------------
हर्षल (१७/४/२०१३ - दु. ३.३०)

१५.४.१३

दोन मी...


जरी खुले आकाश मला,
कळे न; जावे कुण्या दिशेला,
गुंतत जातो स्वतःत मग मी,
शोधत बसतो स्वतःस मग मी...

देत जगाला तोंड एक तो,
दुसरा शोधे जगी कोण मी?
कुणास नाही ठाऊक माझे,
माझ्यामधले असे दोन मी...
-----------------------------------------
हर्षल (१४/४/१३ - सायं. ७.४५)

४.४.१३

वसंता तुझ्या येण्याने...

वसंता तुझ्या येण्याने, फार न काही बदलले,
पक्षी मुक्त जाहले आणि वृक्ष जरी अन् मोहरले...

रूक्ष उन्हाचा असह्य चटका, काहिली करे अंगांची,
जाळून आलो दुर्गुण, केली उधळण जरी अन् रंगांची...

वणवण करिती बांधव माझे, दोन घोट पाण्यासाठी,
लाख घोषणा कुणी करो, म्हणो देश जरी अन् त्यांपाठी...

अता न सुचती कविता मजला, आईच तेव्हा आठवते,
डोळ्यांमधले पाणी सुद्धा, पळीत जरी अन् साठवते...

..........................................................

वसंता तुला एक मागणे, नियम मोडून देशील का?
आगमनाच्या आनंदाला, पाऊस घेऊन येशील का?
--------------------------------------------
हर्षल (४/४/२०१३ - दु. १.००)

२६.३.१३

मेरी उडान...

फिर वही बाते, फिर वही चेहेरे,
वही याँदे, वही सारे,
बीते दिनकी बात निकाले,
लेकर आते रोती शक्ले,
नया कुछ करते नही,
जिंदगीमें रंग भरते नही,
और गुजरे पिछली गलियोंसे,
अपनें छुटे निशाँन ढुंढते...

क्यूँ ना होता पाना खुदको इतनाभी आसान?
सीख ज्यों होती हरेक मोड की कभी ना एकसमान...

दिन के बाद आए रात, रोज नया सवेरा,
एक डाल पर पँछीभी ना रोज करे बसेरा...
जिस दिन बाँधे पंख खुदहीने,
छोड दी बीच उडान,
लाख मिलेंगे बुझे सितारे,
पडे कही सुनसान...

करो नजारा खुली आँखसे,
दुनिया देखो नयी सोचसे,
बदला जाता रोज किनारा,
तैर ना पाता कभी जो हारा,
या तो ढूँढो सागर न्यारा,
मन में रखलो कोई तारा,
मँजीलतक ना पहूँचो जबतक,
रुकने ना दो खुदको तबतक...
अपने मन में ले लो ठान,
रोक सके ना मुझको कोई,
और ना मेरी उडान...
और ना मेरी उडान...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२६/३/२०१३ - ११.४५  PM)

२५.३.१३

नसतेस ऑनलाईन तू...


नसतेस ऑनलाईन तू, इंट्रेस्टच निघून जातो,
तुजवीण कुणी आवडेना, पण ऑप्शन पाहून घेतो...

येतो मी फेसबूकवरती, बोलण्या तुझ्याशी काही,
असतेस ऑफलाईन तू, मज काही समजत नाही,
मग दोनदोनदा तुझ्या त्या, प्रोफाईलवरती जातो,
अन् प्रोफाईलच्या पिकला, मी तासन् तास पहातो...

दिसतात तुझ्या अपडेट, कोपर्‍यात उजव्या जेव्हा,
आहेस ऑनलाईन तू, हे कळते मजला तेव्हा,
पण चॅटींगसाठी तुजला का भाव गडे लागतो?
क्षणभर बोलायासाठी, मी रात्रभर जागतो...

तू तरीही बोलत नाही, काहीही सांगत नाही,
वाटे जरी "खूपच झाले", तरी वाट बघत मी राही...
या फेसबूकाचासुद्धा, आता कंटाळा येतो,
काहीही मिळकत नाही, पण त्रास फुकाचा होतो...

एवढे करूनही जेव्हा, मज तुझी आठवण येते,
ना राहवून ती मजला, मग येथे घेऊन येते,
नवनवीन पाखरांचा, मज पत्ता मिळूनी  जातो,
क्षणभर का होईना मी, अन् तुलाच विसरून जातो...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२५/३/२०१३ - रात्रौ. ११.२०)

२२.२.१३

जमेल का तुला...

निघायचे असेल ना? जपून जा,
घरात काय राहिले, बघून जा...

सुने तुझ्याविना असेल देवघर,
(सुगंधरूप त्यात तू भरून जा...)

छतास उंच राहिले करायचे,
इथून तू हळूच अन् लवून जा...

सुके
बाग ही तुझ्या विना, जरा;
फुलांस स्पर्श एकदा करून जा...

जमेल का तुला फिरून पाहणे?
जमेल त्याक्षणी पुन्हा वळून जा...

पुरे मनात आसवांस ढाळणे,
इथेच यायचेय ना?, हसून जा...
----------------------------------------------------------------
हर्षल (२२/२/१३ - सकाळी १०.३५)