१९.१०.१३

"संहिता" - चित्रपट परीचय

.....................मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता-द स्क्रीप्ट" या चित्रपटाच्या प्रिमियरला चिन्मय दामले (चिनुक्स)मुळे जाण्याची संधी मिळाली. प्रत्यक्षात सारे कलाकार पाहण्यास मिळाल्यामुळे आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आल्यामुळे खूप मजा आली.

देविका दफ्तरदारसोबत :
प्रकाशचित्र सौजन्य : नचिकेत जोशी
मिलिंद सोमणसोबत :
प्रकाशचित्र सौजन्य : हर्षद पेंडसे

चित्रपटाविषयी :
...................'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं जेव्हा आपण सगळे म्हणतो, त्यामध्ये बर्‍याचदा पूर्वी घडून गेलेल्या घटनांशी बरचसं साम्य असलेल्या घटनांना आपण अनुभवत असतो. मग त्या घटना आपल्याच आयुष्याशी निगडीत असो किंवा दुसर्‍या कुणाच्याही... घटना घडत असतात, त्यांची आठवण ठेवली जाते, त्यांच्या कथा-दंतकथा होतात... आणि कालांतराने त्यावर, कुणाला अगदी काही खास वाटलंच, तर चित्रपटही निघतात...
...................आता चित्रपट म्हटला की पटकथा पहिले हवी. त्या पटकथेचा उगम (शिरीन आणि तिचा पॅरॅलाईझ्ड नवरा), त्या मागचा प्रेरणास्त्रोत (तारा देऊस्कर), त्या पटकथेचा प्रवाह (हेमांगिनी) आणि त्या पटकथेचा आत्मा (रेवती) आणि या सर्वांमार्फत ती पटकथा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे "संहिता- द स्क्रीप्ट". अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेल्या या चित्रपटाने दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावली आहेत. त्यामुळे मुळात या चित्रपटाची संकल्पना आणि त्याचं मूर्त रूप हे पडद्यावर दिसणार्‍या गोष्टींपेक्षा, ऐकू येणार्‍या संवादांपेक्षा आपल्या अंतर्मनात होणार्‍या उलथापालथीचं, आणि त्यातून आपल्याला होणार्‍या स्वतःबद्दलच्या साक्षात्काराशी खूप जास्त निगडीत आहे.
...................एक उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण स्त्री असणार्‍या; माहितीपट दिग्दर्शिका रेवती (देविका दफ्तरदार)ला, पक्षाघात होण्यापूर्वी नावाजलेला निर्माता असलेल्या माणसाची; त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्याची शेवटपर्यंत सेवा करणारी पत्नी शिरीन (ज्योती सुभाष) भेटायला बोलावते. आपल्या पतीची शेवटची इच्छा असलेल्या, १९६० च्या दशकात प्रकाशित झालेल्या एका लेखिकेच्या "दर्पण" या कथेवर चित्रपट बनवायलाच हवा म्हणून शिरीन, रेवतीला सांगते. त्यानुसार रेवती, त्या कथेची लेखिका तारा देऊस्कर (उत्तरा बावकर) यांना भेटते. त्या तिला कथा ऐकवतात. आणि त्यानुसार चित्रपटाची संहिता लिहितांना रेवती, हेमांगिनी (राजेश्वरी सचदेव) हिलाही भेटते, कथा ऐकवते. ह्या प्रवासात "दर्पण" कथा प्रत्यक्षात पडद्यावर कशी दिसेल ह्याचा रेवतीचा कल्पनाविलास आपल्यासमोर घेऊन येतो, 'संहिताचा' एक समांतर प्रवास... भव्य राजवाडा, शाही थाट, मैफिल, पोशाख, खानसामा, अदब, जरब, जुना पण हवासा वाटणारा काळ... इतकी सहज गुंफण ह्या चित्रपटात दाखवलीये की, मुळात संहिता कुठली, आणि वास्तव कुठलं याचा फरक सापडेनासा होतो... आणि हेच या चित्रपटाचं खरं यश आहे!!! स्मित
...................'दर्पण' कथा हेरवाडच्या संस्थानाचे राजे असलेल्या सत्यशील जहागिरदारांची (मिलिंद सोमण). त्यांच्या उच्चशिक्षित, स्वतंत्र विचारांची पत्नी असलेल्या मालविकाबाईंची (देविका दफ्तरदार). वडीलांनी बळजबरी, लहानपणीच लावून दिलेल्या लग्नामुळे असलेल्या असंतोषाची, आणि एकदा घडून गेलेल्या गोष्टीची जबाबदारी घेऊन, ती निभावण्याचा समजूतदारपणा न दाखवण्याची. आपल्या स्वतंत्र वृत्तीला मोडता न घालण्याची, आणि समर्पित न होण्याची. मग अशा वेळी राजवाड्यात येणार्‍या, दैवी गळा लाभलेल्या गायिका भैरवीच्या (राजेश्वरी सचदेव) प्रेमात पडून, राजधर्म विसरणार्‍या राजाच्या हातून चूक घडणे ओघाने आलंच. मग त्यांचा विरह, पुन्हा एकत्र येणं. त्या एकत्र येण्याला एक नवं नातं जोडलं गेलेलं असणं. ज्या नात्याचं प्रतिबिंब संपूर्ण जगाला अगदी स्पष्ट दिसत असतं, पण स्वत:चंच रूप त्यात पाहण्याची वाटणारी लाज खरी की स्वधर्माशी केलेली प्रतारणा आणि त्याबद्दल वाटणारी अपराधी भावना खरी... दुसरीकडे, आपल्या आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आनंद देणंही तितकंच आवश्यक आहे याचा विसर पडलेली मालविका... सत्यशील राजाच्या आयुष्यात परतलेला तो आनंद, आणि त्याचवेळी त्याच्या प्रतिबिंबात दिसणारं त्याचं दु:ख, त्या दु:खामागचा आपला उदासीनपणा, आणि त्यापायी मुकलेल्या आपल्याच आनंदाची न होणारी भरपाई या सगळ्यांत काहीतरी सुटून गेलं नक्की असं वाटून पुढे काय, हा प्रश्न पडलेली... भैरवी इथे गायनासाठी आहे, आणि राजाला प्रेम देण्यासाठी... जीव ओतून गाणं आणि मनापासून प्रेम करणं... तर ते प्रतिबिंब हाच या तिघांना आपली स्वतःची ओळख करून देणारा "दर्पण"..
...................बदललेल्या काळासोबत मात्र, प्रश्न काही बदलत नाही. रेवतीचं आयुष्य अगदी मालविकासारखंच... स्वतंत्र, उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण त्यामुळे मुंबईत एकटं राहणं. तिचा नवरा रणवीर फ्लॉरीकल्चरीस्ट आहे. वडिलोपार्जित जमिनीवर फुलं उगवून ती एक्स्पोर्ट करण्याचा त्याचा व्यवसाय. त्यामुळे गावाकडे राहणं, वडीलांसोबत. दोघांचं लव्ह मॅरेज. मुलगी हॉस्टेलवर. नात्यांतली गुंतागुंत, आणि त्यामुळे घटस्फोटापर्यंत आलेली गोष्ट. शिरीनचं एक उपकथानक आहे. तीचं एक वेगळंच दु:खंय... पण 'संहिते'तल्या समर्पित प्रेमाचं उदाहरण ती स्वतः आहे. हेमांगिनीचं उपकथानक आहे. आणि ती 'संहिते'तल्या शोषणाचं उदाहरण आहे. तर तारा देऊस्कर ह्या 'संहिते'च्या "...अ‍ॅण्ड दे लिव्हड् हॅपिली एव्हर आफ्टर'चं उदाहरण आहे. समांतर संहिता आणि त्याचं आजच्या काळाशी असलेलं साम्य यामुळेच मी सुरुवातीला 'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं म्हटलंय. मात्र, इतिहासातून शिकण्यासारखी एकच गोष्ट असते ती म्हणजे, बदलती मानसिकता. बदलता काळ आपल्याला प्रगल्भ बनवत असतो. आणि जेव्हा हिस्टरी रिपीट होत असते, तेव्हा आपण पूर्वीपेक्षा खूप प्रगल्भ झालेलो असतो. ज्यामुळे ज्या गोष्टीचा शेवट पूर्वी दु:खद झालेला असतो, त्या गोष्टीचा शेवट सुखद कसा करायचा हे आपल्याला कळलेलं असतं. जर तसं नसेल, तर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' असं म्हणण्यावाचून पर्याय नसतो. तोपर्यंत त्याची संहिता आपली आपल्यालाच लिहावी लागते.
...................ह्या चित्रपटाचे खूप पैलू आहेत. संवाद ही सर्वांत महत्त्वाची बाजू. बर्‍याच दृश्यांमधली ओळन् ओळ विचार करायला लावणारी. त्यानंतर गाणी, आरती अंकलीकर-टीकेकरांचा आवाज, संगीत सगळं उत्तमच! चित्रीकरण, सेट, पोशाख... बोलावं तितकं कमीच... अभिनय सर्वांचा अगदी सहज-सुंदर. देविका दफ्तरदार दोन्ही भुमिकेंमध्ये खासच... मालविका म्हणून तर मला खूपच भावलीये ती... मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सुद्धा उत्तम! उत्तरा आणि ज्योतीजी तर लीलया वावरल्यात... ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार्‍या सुमित्रा भावे आणि गीतकार सुनिल सुकथनकर यांना सलाम! ही कलाकृती नक्कीच अविस्मरणीय झालीय...
...................एकंदर हा चित्रपट 'क्लास' साठी आहे. 'गॉड इज अ बॅड स्क्रीप्टराईटर' हे जरी खरं असलं, तरी त्याच्या लिखाणाचा ड्राफ्ट आपल्याहाती देऊन तो आपल्या आयुष्याची एक उत्तम संहिता लिहिण्याची संधी आपल्याला देतो, याचा अर्थ तो एक उत्तम डिरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही! आणि 'आपण आपल्या आयुष्याची संहिता स्वतःच का लिहू शकत नाही?' याचं उत्तरही वरच्या ओळीतच दडलंय... कारण आपल्या संहितेतली बरीचशी पात्र त्याने निवडलेली असतात, रेखाटली असतात. ती समजून घ्यायला वेळ लागतोच... आणि लिहायला आयुष्यं!
---------------------हर्षल (१९/१०/२०१३ - दु. १.४५)