२९.१२.१३

अपूर्ण कविता...

काल आणि परवा, दोन जुन्या मैत्रिणी भेटल्या,
एकीने हळवं होत, डोळ्यांत पाहत विचारलं, "अजुनही कविता करतोस का रे?"
दुसरीने शुन्यात पाहत, कोरडेपणानं विचारलं, "अजुनही कविताच करतोस का रे?"
आणि मी स्वतःत डोकावून पाहिलं,
आठवणींच्या खोल तळाशी जाऊन, अपूर्ण राहिलेल्या दोन्ही कवितांना कवटाळलं...

एक लिहून खोडलेली,
दुसरी चिडून फाडलेली...
त्यानंतर मला आठवत नाही; एकही कविता सुचलेली,
कुणासाठी लिहिलेली, कुणापर्यंत पोचलेली...
-हर्षल (२३/१२/१३ - रा. १०.४०)

१९.१०.१३

"संहिता" - चित्रपट परीचय

.....................मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता-द स्क्रीप्ट" या चित्रपटाच्या प्रिमियरला चिन्मय दामले (चिनुक्स)मुळे जाण्याची संधी मिळाली. प्रत्यक्षात सारे कलाकार पाहण्यास मिळाल्यामुळे आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आल्यामुळे खूप मजा आली.

देविका दफ्तरदारसोबत :
प्रकाशचित्र सौजन्य : नचिकेत जोशी
मिलिंद सोमणसोबत :
प्रकाशचित्र सौजन्य : हर्षद पेंडसे

चित्रपटाविषयी :
...................'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं जेव्हा आपण सगळे म्हणतो, त्यामध्ये बर्‍याचदा पूर्वी घडून गेलेल्या घटनांशी बरचसं साम्य असलेल्या घटनांना आपण अनुभवत असतो. मग त्या घटना आपल्याच आयुष्याशी निगडीत असो किंवा दुसर्‍या कुणाच्याही... घटना घडत असतात, त्यांची आठवण ठेवली जाते, त्यांच्या कथा-दंतकथा होतात... आणि कालांतराने त्यावर, कुणाला अगदी काही खास वाटलंच, तर चित्रपटही निघतात...
...................आता चित्रपट म्हटला की पटकथा पहिले हवी. त्या पटकथेचा उगम (शिरीन आणि तिचा पॅरॅलाईझ्ड नवरा), त्या मागचा प्रेरणास्त्रोत (तारा देऊस्कर), त्या पटकथेचा प्रवाह (हेमांगिनी) आणि त्या पटकथेचा आत्मा (रेवती) आणि या सर्वांमार्फत ती पटकथा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे "संहिता- द स्क्रीप्ट". अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेल्या या चित्रपटाने दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावली आहेत. त्यामुळे मुळात या चित्रपटाची संकल्पना आणि त्याचं मूर्त रूप हे पडद्यावर दिसणार्‍या गोष्टींपेक्षा, ऐकू येणार्‍या संवादांपेक्षा आपल्या अंतर्मनात होणार्‍या उलथापालथीचं, आणि त्यातून आपल्याला होणार्‍या स्वतःबद्दलच्या साक्षात्काराशी खूप जास्त निगडीत आहे.
...................एक उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण स्त्री असणार्‍या; माहितीपट दिग्दर्शिका रेवती (देविका दफ्तरदार)ला, पक्षाघात होण्यापूर्वी नावाजलेला निर्माता असलेल्या माणसाची; त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्याची शेवटपर्यंत सेवा करणारी पत्नी शिरीन (ज्योती सुभाष) भेटायला बोलावते. आपल्या पतीची शेवटची इच्छा असलेल्या, १९६० च्या दशकात प्रकाशित झालेल्या एका लेखिकेच्या "दर्पण" या कथेवर चित्रपट बनवायलाच हवा म्हणून शिरीन, रेवतीला सांगते. त्यानुसार रेवती, त्या कथेची लेखिका तारा देऊस्कर (उत्तरा बावकर) यांना भेटते. त्या तिला कथा ऐकवतात. आणि त्यानुसार चित्रपटाची संहिता लिहितांना रेवती, हेमांगिनी (राजेश्वरी सचदेव) हिलाही भेटते, कथा ऐकवते. ह्या प्रवासात "दर्पण" कथा प्रत्यक्षात पडद्यावर कशी दिसेल ह्याचा रेवतीचा कल्पनाविलास आपल्यासमोर घेऊन येतो, 'संहिताचा' एक समांतर प्रवास... भव्य राजवाडा, शाही थाट, मैफिल, पोशाख, खानसामा, अदब, जरब, जुना पण हवासा वाटणारा काळ... इतकी सहज गुंफण ह्या चित्रपटात दाखवलीये की, मुळात संहिता कुठली, आणि वास्तव कुठलं याचा फरक सापडेनासा होतो... आणि हेच या चित्रपटाचं खरं यश आहे!!! स्मित
...................'दर्पण' कथा हेरवाडच्या संस्थानाचे राजे असलेल्या सत्यशील जहागिरदारांची (मिलिंद सोमण). त्यांच्या उच्चशिक्षित, स्वतंत्र विचारांची पत्नी असलेल्या मालविकाबाईंची (देविका दफ्तरदार). वडीलांनी बळजबरी, लहानपणीच लावून दिलेल्या लग्नामुळे असलेल्या असंतोषाची, आणि एकदा घडून गेलेल्या गोष्टीची जबाबदारी घेऊन, ती निभावण्याचा समजूतदारपणा न दाखवण्याची. आपल्या स्वतंत्र वृत्तीला मोडता न घालण्याची, आणि समर्पित न होण्याची. मग अशा वेळी राजवाड्यात येणार्‍या, दैवी गळा लाभलेल्या गायिका भैरवीच्या (राजेश्वरी सचदेव) प्रेमात पडून, राजधर्म विसरणार्‍या राजाच्या हातून चूक घडणे ओघाने आलंच. मग त्यांचा विरह, पुन्हा एकत्र येणं. त्या एकत्र येण्याला एक नवं नातं जोडलं गेलेलं असणं. ज्या नात्याचं प्रतिबिंब संपूर्ण जगाला अगदी स्पष्ट दिसत असतं, पण स्वत:चंच रूप त्यात पाहण्याची वाटणारी लाज खरी की स्वधर्माशी केलेली प्रतारणा आणि त्याबद्दल वाटणारी अपराधी भावना खरी... दुसरीकडे, आपल्या आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आनंद देणंही तितकंच आवश्यक आहे याचा विसर पडलेली मालविका... सत्यशील राजाच्या आयुष्यात परतलेला तो आनंद, आणि त्याचवेळी त्याच्या प्रतिबिंबात दिसणारं त्याचं दु:ख, त्या दु:खामागचा आपला उदासीनपणा, आणि त्यापायी मुकलेल्या आपल्याच आनंदाची न होणारी भरपाई या सगळ्यांत काहीतरी सुटून गेलं नक्की असं वाटून पुढे काय, हा प्रश्न पडलेली... भैरवी इथे गायनासाठी आहे, आणि राजाला प्रेम देण्यासाठी... जीव ओतून गाणं आणि मनापासून प्रेम करणं... तर ते प्रतिबिंब हाच या तिघांना आपली स्वतःची ओळख करून देणारा "दर्पण"..
...................बदललेल्या काळासोबत मात्र, प्रश्न काही बदलत नाही. रेवतीचं आयुष्य अगदी मालविकासारखंच... स्वतंत्र, उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण त्यामुळे मुंबईत एकटं राहणं. तिचा नवरा रणवीर फ्लॉरीकल्चरीस्ट आहे. वडिलोपार्जित जमिनीवर फुलं उगवून ती एक्स्पोर्ट करण्याचा त्याचा व्यवसाय. त्यामुळे गावाकडे राहणं, वडीलांसोबत. दोघांचं लव्ह मॅरेज. मुलगी हॉस्टेलवर. नात्यांतली गुंतागुंत, आणि त्यामुळे घटस्फोटापर्यंत आलेली गोष्ट. शिरीनचं एक उपकथानक आहे. तीचं एक वेगळंच दु:खंय... पण 'संहिते'तल्या समर्पित प्रेमाचं उदाहरण ती स्वतः आहे. हेमांगिनीचं उपकथानक आहे. आणि ती 'संहिते'तल्या शोषणाचं उदाहरण आहे. तर तारा देऊस्कर ह्या 'संहिते'च्या "...अ‍ॅण्ड दे लिव्हड् हॅपिली एव्हर आफ्टर'चं उदाहरण आहे. समांतर संहिता आणि त्याचं आजच्या काळाशी असलेलं साम्य यामुळेच मी सुरुवातीला 'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं म्हटलंय. मात्र, इतिहासातून शिकण्यासारखी एकच गोष्ट असते ती म्हणजे, बदलती मानसिकता. बदलता काळ आपल्याला प्रगल्भ बनवत असतो. आणि जेव्हा हिस्टरी रिपीट होत असते, तेव्हा आपण पूर्वीपेक्षा खूप प्रगल्भ झालेलो असतो. ज्यामुळे ज्या गोष्टीचा शेवट पूर्वी दु:खद झालेला असतो, त्या गोष्टीचा शेवट सुखद कसा करायचा हे आपल्याला कळलेलं असतं. जर तसं नसेल, तर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' असं म्हणण्यावाचून पर्याय नसतो. तोपर्यंत त्याची संहिता आपली आपल्यालाच लिहावी लागते.
...................ह्या चित्रपटाचे खूप पैलू आहेत. संवाद ही सर्वांत महत्त्वाची बाजू. बर्‍याच दृश्यांमधली ओळन् ओळ विचार करायला लावणारी. त्यानंतर गाणी, आरती अंकलीकर-टीकेकरांचा आवाज, संगीत सगळं उत्तमच! चित्रीकरण, सेट, पोशाख... बोलावं तितकं कमीच... अभिनय सर्वांचा अगदी सहज-सुंदर. देविका दफ्तरदार दोन्ही भुमिकेंमध्ये खासच... मालविका म्हणून तर मला खूपच भावलीये ती... मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सुद्धा उत्तम! उत्तरा आणि ज्योतीजी तर लीलया वावरल्यात... ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार्‍या सुमित्रा भावे आणि गीतकार सुनिल सुकथनकर यांना सलाम! ही कलाकृती नक्कीच अविस्मरणीय झालीय...
...................एकंदर हा चित्रपट 'क्लास' साठी आहे. 'गॉड इज अ बॅड स्क्रीप्टराईटर' हे जरी खरं असलं, तरी त्याच्या लिखाणाचा ड्राफ्ट आपल्याहाती देऊन तो आपल्या आयुष्याची एक उत्तम संहिता लिहिण्याची संधी आपल्याला देतो, याचा अर्थ तो एक उत्तम डिरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही! आणि 'आपण आपल्या आयुष्याची संहिता स्वतःच का लिहू शकत नाही?' याचं उत्तरही वरच्या ओळीतच दडलंय... कारण आपल्या संहितेतली बरीचशी पात्र त्याने निवडलेली असतात, रेखाटली असतात. ती समजून घ्यायला वेळ लागतोच... आणि लिहायला आयुष्यं!
---------------------हर्षल (१९/१०/२०१३ - दु. १.४५)

१०.८.१३

पर्याय

---------------"प्रेम वगैरे म्हणजे नुसतं थोतांड असतं रे... थोडे दिवस गोड गोड बोलायचं, मग हातात हात घालून गावभर हिंडायचं. मग एकमेकांसोबत पाहिजे ती थेरं करायची; ती सुद्धा जगापासून लपून छपून. त्यातून निभावलं नाही म्हणजे एकमेकांबद्दल किळस वाटून मग तोंड काळं करायचं; आणि निभावलं तर आदर वाटून लग्न करायचं... सालं, तोंड काळं केलं; तरी पुन्हा एकदा त्यातूनच जायचा मोह कुणालाच आवरत नाही आणि... आणि जर का लग्न झालं..."
असं म्हणून रोशनने ज्या तुसडेपणाने ग्लास तोंडाला लावला; तो सगळा संपल्यावरच काढला. प्रत्येक पार्टीमध्ये; ह्या विषयावर येऊन रोशनची गाडी थांबायची. किंबहूना सुटायची. त्याचा लग्न या विषयावरचा राग मग बाहेर यायला सुरू व्हायचा. लग्नापेक्षा, प्रेमविवाहावर त्याचा राग जास्त होता. खरंतर त्याचा स्वतःचाच प्रेमविवाह होता, पण लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याने त्याच्या मनात भरलेला रोष तो असा जगजाहीरपणे मांडतांना दिसायचा. समीरला त्याचं बोलणं मनावर घ्यावसं कधीच वाटलं नव्हतं, पण आज मात्र रोशनच्या बोलण्यात बरंच काही तथ्य आहे असं समीरलाच वाटायला लागलं.
---------------समीरचं रात्री उशीरा घरी येणं तन्वीला कधीच खटकलं नव्हत, जोपर्यंत समीर ऑफिसमधून सरळ, किंवा पार्टीमधून हसत-खेळत घरी यायचा. पिऊन तर्र झालेल्या मित्रांना व्यवस्थित घरी सोडून आल्यानंतर, त्यांनी केलेल्या चित्र-विचित्र गोष्टींना रंगवून; तिला अगदी पोट दुखेपर्यंत हसवायचा. मग तिचं जेवण होईपर्यंत तिच्यासोबत बसायचा. त्या दोघांचा प्रेमविवाह असुनही रोशनच्या म्हणण्याप्रमाणे ते दु:खी-कष्टी नव्हते. पण सारखं सुखसुद्धा माणसाला बोचतं म्हणतात, तसं काहीसं त्यांच्यात घडावं असं... नियतीला वगैरे नाही, त्यांच्यातल्याच एकाला वाटत होतं. म्हणजे, तन्वीला तसं काही वाटत असावं असं समीरला उगाच वाटायचं, पण त्याहीपेक्षा ते आपल्याला जास्त प्रकर्षाने वाटतंय हे तोच मनोमन कबूल करत असायचा. पण त्यामुळे आपण आपलं सुख हरवून बसतोय, या काळजीने त्याला अताशा झोपही लागत नव्हती. रोज रात्री बेडवर पडल्यानंतर विचारांची गर्दी जमायला सुरू व्हायची.
---------------"आपण नक्की काय शोधतोय? लग्नाआधीचा मी? की आताचा मी? लग्नाआधीची तन्वी? की आताची तन्वी? आणि तसंही लग्न होऊन फक्त दोनच वर्ष झालीये, मग इतक्या लवकर आपल्याला या सर्वांचा कंटाळा यावा? छे,छे... कंटाळा कसा येईल? सगळं छान चाललंय की!!! आपल्याकडे सगळं उत्तम आहे की... घर, गाडी, चांगल्या पगाराची नोकरी, आणि तन्वी... तिच्यासारखी मुलगी आपल्या आयुष्यात यावी, म्हणून मनातल्या मनात किती चित्र रंगवली होती आपण. तिला पहिल्यांदा पाहिलं ते बेंगलोरच्या एका चित्रप्रदर्शनात. तिथे तिच्या मैत्रीणीसोबत आलेली असतांना, एकेका चित्रासमोर कितीतरी वेळ उभी राहून, कसलासा विचार करून मगच पुढच्या चित्राला भेट देणारी ती... आपण तिथे एकटेच फिरत असतांना, सहज तिच्या बाजूला जाऊन उभे राहिलो काय, त्यावेळी ती पाहत असलेल्या चित्रातला एक विचित्र आकाराचा तांब्या (?) पाहून आपण हसलो काय, आणि त्यावेळी, 'मूर्ख' असं म्हणून तिने चिडून आपल्याकडे पाहिलं काय... बस्स... नंतर तिची ओळख काढून, तिच्या ऑफिसच्या वेळा साधून, ती येण्या-जाण्याच्या रस्त्यांत... असं बरंच काही करून आपण तिला पटवली. सुरूवातीला अवघड वाटणारी गोष्ट नंतर अगदी सोपी वाटायला लागली. आपल्यालाही हे जमतं असं वाटून एकदम कॉन्फिडन्स ऑन लेव्हल नाईन... पण तरीही तिच्या सोबत फिरतांना सुरूवातीला एक भितीयुक्त आदर वाटायचा आपल्याला तिच्याबद्दल... त्यामुळे तिचा हात हातात घ्यावा की न घ्यावा, गर्दीत चालतांना कुणी मुद्दाम तिला धक्का मारू नये म्हणून तिच्या खांद्याभोवती आपण हात टाकावा असं वाटत असुनही आपण घाबरायचो. घाबरायचो, म्हणजे स्वतःलाच. का कोण जाणे, पण ते सर्व वाटत असतांना आपली होणारी अवस्था आपल्याला जाम आवडायची. हातांची थरथर काय, हृदयाची जोरात धडधड काय आणि अचानक तिच्याशी नजरानजर होताच गडबडून दुसरीकडे पाहतांना, तिच्या मात्र आपल्याकडेच काही क्षण रोखून पाहणार्‍या डोळ्यांची भितीही वाटायची, स्वतःबद्दल शरम आणि पुन्हा ती आपलीच आहे हा विश्वास वाटून तिच्याबद्दल वाटणारी ओढ... तूफान!!! मग आपण बाईकवरून बेंगलोर बाहेरगावच्या रस्त्यांवरून फिरता फिरता एक दिवस हिंमत करून तिचा हात आपल्या हातात घेतला, त्यावेळचा तिचा तो स्पर्श... त्यारात्री आपण झोपेत हसत होतो असं रूममेटनं सांगितलं, तेव्हाही आपण हलकेच हसलो. शप्पथ!!! दॅट वॉज लाईक अ क्लोजेस्ट मोमेंट विथ हॅपिनेस अँड आय लिव्हड् इट विथ अट्मोस्ट प्लेजर... पुढच्या वेळी, त्याच्या पुढच्या वेळी आणि त्याच्या पुढच्याही... आणि त्या संध्याकाळी, लालबाग गार्डनमध्ये तिला केलेला, आयुष्यातला फर्स्ट किस... सगळं जग गुंडाळून बाजूला ठेवून, फक्त दोघांच्या भोवतीच सारं आकाश आणि जमीन पांघरून कितीतरी वेळ आपण हरवून गेलो होतो. खूप काही अचिव्ह केलंय असं वाटायला लागलं..."
---------------तन्वी झोपलीये का हे पाहण्यासाठी तो अलगद दुसर्‍या कुशीवर वळला. बेडलँप ऑन करून त्याने तिच्या हनुवटीवर तर्जनी ठेवली. तो तिचा चेहेरा स्वतःकडे वळवणार, तेवढ्यात तन्वीच त्याच्याकडे वळली. झटकन त्याने हात मागे खेचला. तन्वी जागी आहे असं वाटून त्याने तिच्या केसांत हात फिरवला. मग तिने कुठलीही हालचाल केली नाही. समीरला मात्र अजुनही झोप येत नव्हती. उठून किचनमध्ये जाऊन तो पाणी प्यायला. रात्रीचे दोनच वाजले होते. उद्या शनिवार, त्यामुळे दोन दिवस मनाच्या या अवस्थेत कसे काढायचे ह्या विचारांनी तो अस्वस्थ होता. मग बाहेर बाल्कनीतल्या आरामखुर्चीवर जाऊन तो टेकला.
---------------"ह्या सगळ्यांत तन्वीला आपण का त्रास देतोय? म्हणजे, आपल्या मनात असलेल्या गोंधळाला ती कुठल्याप्रकारे जबाबदार आहे? मग आपण ही अशी सायलेंट ट्रीटमेंट तिला का द्यावी? पण हा आपल्या स्वभावाचा भाग आहे, हे तिलाही ठाऊक आहेच की. कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्याला काय वाटतंय, नक्की कशाचा गोंधळ चाललाय, आणि आपण त्याच्याशी कशाप्रकारे लढतोय आणि त्यातून आपण कसे बाहेर पडणार आहोत ह्याचा अंदाज कुणालाच येऊ नये यासाठी आपण अक्षरशः कोशात जाऊन बसतो. बाहेरचं जग जोपर्यंत आपल्या शांततेला सरावत नाही, तोपर्यंत आपण त्यात राहून आपल्या आत काय चाललंय याचा अंदाज घेतो, मग बाहेर काय होतंय आणि ते कसं बदलवायचं याचा खल करतो, आणि मग पुन्हा पहिल्यासारखेच ताकदीने बाहेर येऊन बेसावध झालेल्या जगाला आश्चर्याचे धक्के देत, आपल्या मनात गोंधळ निर्माण करणार्‍या गोष्टीबद्दल जगाच्याच मनात संभ्रम निर्माण करतो. आणि मग 'कसले फुसके सापळे रचतात मला अडकवायला?' म्हणून स्वतःवरच खूश होतो. इथे मात्र माझा संघर्ष माझ्याशीच आहे, आणि त्यात तन्वी सापडलीये, म्हणून तर मी गोंधळलोय. तसं ती आहे म्हणून मी आज इथे या वेळेला स्वतःची अशी ओळख निर्माण करून आहे. कारण त्या संध्याकाळी तन्वीने आपल्याला झिडकारलं नसतं तर... पार्‍याला वाहून जायची परवानगी दिली असती तर... कदाचीत ती वेळ आपल्यामुळे आली म्हणून आपण आपल्या आजच्या परीस्थितीचं श्रेय स्वतःलाही देऊ इच्छितो. किंवा ते आपल्यामुळेच झालं असंच आपल्याला वाटतंय, हो ना? हो! नाही! असं कसं? तिने त्यादिवशी आपल्याला नकार दिला आणि; 'आपण आतापर्यंत करत होतोच की हे? मग आता का नाही म्हणतेस?' म्हणून तिला बळजबरी ओढण्याचा केलेला प्रयत्न आणि तिच्या डोळ्यांत आलेले अश्रू... खोटेच वाटलेले ना आपल्याला? त्यावेळी तिने म्हटलेले ते शब्दः
"तू फक्त एवढंच करण्यासाठी माझ्याजवळ येत असशील, तर मग मला हे नकोय... आणि जोपर्यंत तुला मी काय म्हणतेय याचं गांभीर्य नाही, तोपर्यंत आपण न भेटणंच बरं... "
शॅ:... एका क्षणात सगळ्या रंगाचा बेरंग झाला होता. सगळी झिंग मातीत मिळवली होती तिनं. मी असं कधी म्हणालो होतो की मला फक्त तेच हवंय आणि तरीही तिने आपल्यावर असा संशय घ्यावा. डोकं तडकलं. मग मी ही म्हणालो,
"मला कुठलंही एक्स्प्लेनेशन द्यायचं नाहीये, पण आता तू जे काही म्हणतीयेस, त्याबद्दल तुच विचार कर आणि सांग की आपण पुन्हा कधी भेटायचं ते."
मला अजुनही खूप काही बोलायचं होतं, पण त्यावेळी ना मी बोलण्याच्या मन:स्थितीत होतो, ना ती ऐकण्याच्या... आम्ही आमच्या वाटा वेगळ्या करायला एकमेकांना संमती दिली होती. किंवा मीच ती मानली होती.
"
---------------आयुष्य एकाच वेळी किती वेगवेगळ्या ट्रॅकवरून धावत असतं हे समीरला तेव्हा कळालं. कारण तन्वी आयुष्यात आल्यापासून त्याचा अ‍ॅटीट्यूड बदलला होता. ऑफिसमधल्या प्रत्येक कामात समीर अ‍ॅक्टीव्हली सहभागी होऊ लागला होता. त्याचा प्रोजेक्ट्सुद्धा हायली प्रॉफिट देणार्‍या प्रोजेक्टमध्ये आला होता. त्यामुळे विदेशात जाण्याची संधी चालून आली. त्याच्या घरात सुद्धा त्याच्या वागण्यातला आत्मविश्वास पाहून सगळे त्याच्यावर खूश होते. बाबांनी त्याला एक्-दोनदा लग्नाबद्दल विचारूनही पाहिलं. पण त्यावेळी त्याने तन्वीचं नाव सुद्धा घरात सांगितलं नव्हतं. तो सर्वच फ्रंटवर अगदी समाधानी होता, पण लग्न वगैरे... कानाला खडा! त्याला वाटायचं, अभी तो शुरुवात है... अजून खूप काही अचिव्ह करायचंय. आपल्याला हव्या असणार्‍या, आपल्या आई-बाबांसाठी करायच्या खूप गोष्टी अजून बाकी आहेत, मग एवढ्यात लग्नाची घाई वगैरे कशाला? आणि तन्वीसुद्धा थांबायला तयार आहेच की असं वाटून तो निवांत होता. पण मग त्या प्रसंगांनंतर त्याने, तन्वीबद्दल विचारच करायचं बंद केलं. पुढच्या महिन्यात नेदरलँड्सला गेला. तिथून दीड वर्षांनं परत आल्यावर, कंपनीच्या दिल्ली ऑफिसला त्याला जॉईन व्हावं लागलं. परत आल्यानंतर मात्र, एकटं एकटं वाटायला लागलं. दिल्लीमध्ये एकट्यांनं लाईफ काढणं त्याच्या जीवावर येऊ लागलं. हळुहळू ऑफिसमधल्या कलीग्ससोबत त्याची मैत्री जमली. आणि त्यातूनच तो, रोशन, हरदीप, प्रीती, शरद आणि सायरा यांचा ग्रूप फॉर्म झाला. समीर रुळला. आणि पुन्हा तेच...
---------------तीन वाजले तेव्हा, समीर आत आला. फ्रीजमधलं कोक घेऊन त्याने ग्लासात ओतलं. सोफ्यावर बसून त्याने कोक प्यायला सुरूवात केली. इथे मात्र त्याच्या डोक्यातले विचार, मध्येच खटकन् आवाज करून चालू-बंद होणार्‍या फ्रिजमुळे चालू-बंद होत होते. त्याने मग सोफ्यावर मान टाकली. थोड्या वेळाने कोकचा संपलेला ग्लास ठेवायला पुन्हा किचनमध्ये गेला, आणि मग झोपावं म्हणून बेडरूमकडे वळला. तन्वी शांत झोपली होती.
---------------"आपल्याकडे तेव्हा पर्याय होता. पण आपण त्यावेळी दिल्लीहून मुंबईत ट्रान्सफर घेऊन आलो. आल्यानंतर, तन्वीला बेंगलोरला जाऊन भेटलो. तेव्हा तिच्या मनात कुठलंही किल्मिष न ठेवता, ती आपल्याशी त्याच सहजतेनं वागली. दोन वर्ष आपण तिला संपर्कही केला नाही, तरीही तिने त्याबद्दल आपल्याला एका शब्दानेही विचारलं नाही. मग आपणच तिला लग्नाबद्दल विचारलं ते ती 'हो'च म्हणेल याची खात्री होती म्हणून की, ती नाही म्हटली तरी 'सायरा' होतीच म्हणून? आपण तन्वीला विचारून चूक केली का?"
---------------"सायराबरोबर दिल्लीतही आपण त्याच अनुभवातून गेलो होतो. फक्त यावेळी ती थरथर, धडधड आणि भितीयुक्त आदर कुठेच नव्हता. याला कारण मात्र सायराचं लाईफस्टाईल...
"शादी-वादी अभी नहीं यार... अभी तो जीने के दिन है| यहाँ खुदको नहीं सँभाल सकते हम, तो घर-पती-बच्चे-साँस-ससूर-ब्ला-ब्ला कौन सँभालेगा..."
आपल्यालाही हे पटलेलं. त्यामुळे सायरा आपल्यासाठी एकदम योग्य पार्टनर आहे असाच आपला समज झाला. पण लग्नाबद्दल मात्र तिनेच विचारायला हवं, म्हणून आपण तिला विचारलं नाही. नंतरचे दिवस मजेत जात राहिले खरे, पण तिने आपल्याला लग्नाबद्दल विचारलंच नाही. मग बाबांच्या तब्येतीमुळे आपण इकडे यायचा निर्णय घेतला, तरीही सायराने तितक्याच निर्विकार मनाने आपल्याला निरोप दिला.
"
---------------"आणि आज तन्वीशी लग्न करून आपण आनंदात जगत असतांना, अचानक सायराने मुंबईत येऊन आपल्याला लग्नाबद्दल विचारलं, त्यामुळेच हा सगळा गोंधळ माजलाय. तिला आपण लग्न झाल्याचं कळवायला हवं होतं तेव्हाच. शिवाय तन्वीलाही सायराबद्दल आधीच सगळं सांगायला हवं होतं. त्यादिवशी रोशनसोबत ती पार्टीत आली आणि त्याच्यासमोरच तिने आपल्याला 'लग्न करशील का?' म्हणुनही विचारलं. क्षणभर सुखावल्यासारखं वाटलं, पण पुढच्याच क्षणाला, 'हिला माझं लग्न झालंय' हे तरी कसं सांगावं हा प्रश्न पडलाच. रोशन सोबत होता म्हणून वाचलो... त्याने तिला, 'अगं त्याला विचार करायला तरी वेळ दे...' असं म्हणून दूर नेलं. त्याचवेळी तिला सांगून मोकळं झालो असतो तर... पण आता आपल्यासमोर कुठले पर्याय आहेत? तन्वीला सायराबद्दल सारं सांगितलं तर ती काय म्हणेल? आणि सायराला सांगितल्यानंतरची तिची झालेली अवस्था? आणि पार्टीत रोशन जे बोलला, ते आपल्याच बाबतीत आहे की काय? तन्वीचं आपल्यावर प्रेम आहे, त्याबद्दल आपल्याला तिळमात्र शंका नाही. पण आज या क्षणाला तिच्याशिवाय दुसरं कुणी नकोय, हे स्वतःला सुद्धा पटवून द्यावं लागतंय म्हणजे आपण... व्हॉट्स राँग विथ मी?"
---------------चार वाजता समीरला झोप लागली. डोक्यातल्या सगळ्या विचारांनी हळुहळू शांत व्हायला सुरूवात केली. आज रात्रीच्या पार्टीतून समीर उशीरा घरी आला होता. आल्यानंतर त्याने तन्वीला ती जेवलीये की नाही हे न विचारताच बेडरूममध्ये येऊन पडला होता. गेल्या आठवड्यापासून तो अगदी गप्प-गप्प होता. आणि तन्वी हे सारं काही पाहत होती. एकदा तिने विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने फक्त हलकसं हसून तिला जवळ घेतलं होतं. काही बोलला मात्र नव्हता. त्यामुळे तन्वी शांतपणे घरात वावरत होती. पण ती पर्याय शोधत नव्हती, ती उत्तर शोधत होती.
---------------सकाळी दहा वाजता समीरचे डोळे उघडले. तन्वी घर आवरत होती. समीर मात्र तिच्यासमोर कसे जायचे असा विचार करून बेडमध्येच पडून राहिला. थोड्या वेळाने तन्वीच तिथे आली. तिने समीरला हाक मारून उठवलं आणि म्हणाली: "मी फूड बझारमध्ये जाऊन येते समीर. तोपर्यंत तू उठून तयार हो. आपण आज आई-बाबांना भेटायला जाणार आहोत." जातांना तिने, बेडलँपच्या खाली एक चिठ्ठी सरकवली. ती गेल्यानंतर समीरने ती उचलली आणि वाचली.
---------------"आयुष्य पर्याय निवडत जगायचं नसतं समीर. मुळात पर्याय ठेवणं हा सगळ्यांत मोठा मूर्खपणा असतो. तू तुझं आयुष्य निर्णयांवर ठरवावंस, कारण निर्णय एकच असतो. पर्याय फसवे असतात, कधी दोन पर्याय एकसारखेसुद्धा असू शकतात. पण प्रेम हा निर्णय असतो,आणि प्रेमाला पर्यायही नसतो. त्याच्यासारखं दुसरं काहीच नसतं. मला काय वाटतं हे तुला चांगलंच माहीती आहे, पण तुला काय वाटू शकतं आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा याबद्दल जो तुझा गोंधळ उडालाय, त्याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. जो काही निर्णय घ्यायचाय त्याचा सोक्षमोक्ष आताच करून मोकळा हो, आणि यातून बाहेर पड.
तुझीच तन्वी.
"
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 हर्षल (२६/५/२०१२-सायं. ६.००)

२९.७.१३

नाटक परीचय : "येरे येरे पैसा"...

इंजिनीअरींगच्या दुसर्‍या वर्षाला असतांना, माझ्या कॉलेजने, "सीओईपी"ने सादर केलेल्या "समेवर टाळी" या एकांकीकेला २००७ साली फिरोदीया करंडक मिळाला होता. अर्थात, मी त्यात काहीही केलं नव्हतं. पण एक सच्चा सीओईपीअन् म्हणून, कॉलेज संपून चार वर्ष झाली तरीही, "ते जगलेले दिवस..." पुन्हा आठवले, की ताजंतवानं होऊन रोजच्या रहाटगाडग्याला जुंपून घ्यायची ताकद मिळते.

ह्या सगळयाची आठवण यावी असं एक व्यावसायीक नाटक, आज रात्री पाहीलं. औंधमध्ये नव्याने सुरू झालेल्या पंडीत भीमसेन जोशी नाट्यमंदीरात रविवारी २८ जुलै रोजी, रात्री ९.३० वाजता, संजय मोने लिखीत "येरे येरे पैसा" हे नवं डान्सिकल (हा त्यांचाच शब्द) आणि म्युजिकल नाटक सादर झालं. तेजस्वीनी पंडीत हिला रंगभूमीवर पहिल्यांदाच पहायला मिळणार म्हणून आणि घराच्या जवळच नाट्यगृह होतं म्हणूनही हे नाटक पहायचं होतं. तिच्या बरोबर नाटकात अभिजीत खांडकेकर, शेखर फडके आणि सायली मराठे यांच्या भुमिका आहेत. आणि संगीत निलेश मोहरीर यांचं आहे.

आपण जन्माला का आलो? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा शोध घेतो. शाळा, कॉलेज, प्रेम आणि लग्न, नोकरी, घर-दार, बंगला, गाडी, स्टेटस, मुलं आणि त्यांची शिक्षणं, रीटायर्ड झाल्यावर आपण कुणावर अवलंबून राहू नये म्हणून आणि केवळ म्हणूनच... आपण जवळपास सगळेच याच ठरावीक मार्गाने जाणारे प्रवासी, आणि ह्या प्रवासाला अगदी निर्धास्तपणे पार करता येण्याचं साधन म्हणजे पैसा... अनंत काळापासून पडलेल्या या प्रश्नाला उत्तर म्हणून बर्‍याच लोकांचं, कुठल्याही काळात जा, "आपण पैसा कमवण्यासाठी जन्माला आलोय" हे उत्तर नसेल, तर नवल!!!

मग तो पैसा किती कमवायचा? कुणासाठी कमवायचा? कमावलेल्या पैशाचा उपभोग कधी आणि कसा घ्यायचा? पैसा कसा मिळवायचा? त्याच्यासाठी किती खस्ता खायच्या? बरं, किती पैसा कमावला म्हणजे आपल्याला आयुष्य हवं तसं जगता येईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं कधीच कुठल्याच पैसे कमवणार्‍या माणसाने आधीच विचार करून ठेवलेली नसतात. मग त्याचे जसे चांगले परीणाम होतात, तसेच दुष्परीणामही होतात. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि हा विषय मी जन्माला आलो नव्हतो त्याआधीही अस्तित्वात होताच. मग या नाटकात नवीन असं काय? असा प्रश्न मी स्वतःला विचारला नाही. विषय जुनाच, पण नाटक कसं वेगळं होऊ शकतं हे "येरे येरे पैसा..."च्या सादरीकरणातून जाणवतं. जसा एखादा चित्रपट आपण वन टाईम वॉच म्हणतो, तसं हे नाटकही वन टाईम वॉच आहे...

नाटकात दोन सुत्रधार (शेखर आणि सायली) आहेत. ते नाटक शेवटापर्यंत नेतात. आणि मधल्या वेगवेगळ्या भुमिकाही अगदी सहज करतात. गोष्ट अभिजीत आणि तेजस्वीनीची आहे. कॉलेजमध्ये भेटतात आणि प्रेम जुळतं. पण तो बुजरा, ती बबली गर्ल. मग त्याने तिला घाबरत घुबरत विचारणं, तिलाही तो आवडतंच असतोच, पण मुलांनीच 'पहिलं पाऊल' टाकावं अशी अट, मग शेवटी होकार. आता आजच्या काळात संपर्काची साधनं म्हणजे मोबाईल, फेसबूक, लाईक, कमेंट आणि ऑनलाईन लाईन मारणं या सगळ्यावर कमेंट न केली तर नाटक आजच्या काळातलं आहे हे समजायला लहान मुलांना तरी वेळ लागतो आजकाल. असो. मग, ती दारू पिऊन घरी येते म्हणजे मॉडर्न मुलगी, तिची आई फार्मविलेवरून ७०० किलो बटाटे विकते म्हणजे टेक्नोसॅव्ही, आणि बाबा फेसबूकच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर कोटी करून खर्‍या शेतकर्‍यांच्या परिस्थितीवर भाष्य करतात (आयफोन, आयपॅड आणि 'आय पेड' फॉर इट वाली लाचारी). मग तो घरी येतो. बोलणी आणि पुढे रीतसर लग्न वगैरे लागतं आणि मुलगी सासरी जाते. संसार सुरू होतो. आणि मग इथून पुढे खरं या नाटकाचं नाव सार्थ ठरावं असं नाटक सुरू होतं.

ऑफिसमधली डिमांडींग (चालू/त्रासदायक/सेक्षुअली हरास सुद्धा करू शकणारी {हा बॉसचा प्रकार पुरूषाच्या नशीबी क्वचितच असेल...}) बॉस, कामाच्या डेडलाईन्स, वर्क प्रेशर, मग उशीरा घरी येणं, बायकोची तक्रार, मग मुलीच्या काळजीपोटी सासू-सासर्‍यांनी जावयाला समजावू पाहणं... फ्रस्ट्रेशन, ते विसरण्यासाठी दारू-पार्ट्या आणि त्या पार्ट्यांमध्येही त्याच समस्यांनी पछाडलेल्या लोकांची भेट... मग मध्यांतरापर्यंत या जोडप्याला त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या यासाठी ईश्वरी कृपेने १५ कोटी रूपयांची लॉटरी लागते. पुढे, ते युरोप ट्रीप करतात. मग उरलेल्या पैशाची गुंतवणूक करतात. मग तो स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. आणि गुंतत गुंतत जातो. ती एकटी एकटी पडत जाते. पैसा पैसा करत तो बंगला, महाल, सोयी सुविधा, खरेदी करत जातो, आणि ती त्याच्याविना कंटाळून मग स्वतः काम करायला लागते... या नाटकाचा शेवट म्हणजे, तिचं काम करतांना, ती घसरून पडते आणि होणारं मूल दगावतं... पुढे काय होतं, नाटकाचा शेवट हा असाच शोकांत आहे की सुखांत की धक्कातंत्र... हे सगळं नाटक पाहून आपलं आपण ठरवायचं.

हे नाटक म्युजिकल आहे, त्यात गाणी, त्यांवर नाच. पण सुरूवातीचा अर्धा तास एकापाठोपाठ भडीमार होतो तेव्हाच फक्त थोडं नको वाटतं. पण नेपथ्य चांगलंय. व्हिजुअल प्रोजेक्शन्स आहेत, त्यामुळे नाटकातही टेक्नॉलॉजी वापरता येते हे दाखवण्यापुरतं वापरलंय. संवाद, अभिनय सर्वांचाच उत्तमच आहे. शेखर फडके विशेष वाटतो, त्याच्या या नाटकातल्या वैविध्यपूर्ण अभिनयामुळे. नाटकाचा दहावाच प्रयोग होता, त्यामुळे सगळेच कलाकार किमान एकदा तरी संवाद म्हणतांना अडखळले.

आता थोडीशी चीरफाड : आजकाल सर्वच क्षेत्रात कामाच्या वेळा अजिबात ठरलेल्या उरल्या नाहीयेत. खुद्द अभिनय क्षेत्रात रात्री ९.३० च्या प्रयोगासाठी, रोजच्या मालिकांच्या शूटींगसाठी, प्रवास आणि दौरे या सर्वांमुळे कलाकार मंडळींनाही पैशासाठी अहोरात्र काम करावेच लागते. त्यामुळे या नाटकातला नायक आयटी इंजिनीअरच का दाखवलाय, माहित नाही. बरं, आयटीबद्दल जुजबी माहिती वापरून नाटकाची थीम पोचवण्याचा प्रयत्न अपूरा आहे. म्हणजे, आयटी किंवा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स केवळ माहिती गोळा करण्याचं आणि ती पुरवण्याचं काम करतात असा समज आहे. खूप त्रोटक विचार आणि अभ्यास. नायक, बीई कंप्यूटर आणि नायिका आर्किटेक्ट. मग ती कुठल्या कॉलेजमध्ये एकत्र शिकतात? (अकरावी-बारावी सायन्स मान्य... नाटक-स्वातंत्र्य असं नाव देऊया...) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सुत्रधार सांगतात की आता दोघेही आपापल्या कामांमध्ये इतके बिजी झालेत की ते दोघेही एकमेकांना व्हिडिओ चॅटद्वारे भेटतात, बोलतात... तर मग लगेच, त्याच क्षणाला नायिकेला ओकारी येऊन ती आई होणारे असं डिक्लेअर करतात... (किडा वळवळलाच...)

'समेवर टाळी' ह्या एकांकीकेत पैसा ही थीम नव्हती, तर मन आणि बुद्धी यांतलं द्वंद्व ही होती... पण काही काळापुरतं तरी मला आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटला की त्यांनी कितीतरी आधीच या विषयावर एक कलाकृती निर्माण करून 'फिरोदीया' करंडक जिंकला होता. समेवर टाळी

नाटक पहाणं, ही आवड असते. ती असली, की कुठलंही नाटक पहाणेबलच असतं. त्यामुळे आवडवाले लोकहो, पहा एकदा.

हर्षल (२९/७/१३ - स. ३. ३०)

९.५.१३

आयुष्य असं असतं...

कसं जगायचं, कसं जगायचं,
हे कुणालाच माहीत नसतं...
उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं...
आयुष्य असं असतं...

जगतांना फक्त जगायचं असतं...
एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं...
हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून चालायचं असतं...
कळलेलं, कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं...
आयुष्य असं असतं...

देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं...
दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं...
साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं...
कधी मैफल रंगलेलं, कधी खूप मरगळलेलं...
आयुष्य असं असतं...

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं...
प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं...
गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण होऊन सावरलेलं...
आयुष्य असं असतं...
 
आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं...
स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं...
प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,
आयुष्य असंच असतं...
आयुष्य असंच असतं...
-------------------------------------------------------------------------------------------
-हर्षल(२३/०३/२०१०-सायं ५.४०)
मायबोलीवर पूर्वप्रकाशीत 

२५.४.१३

पुन्हा हात हाती धरू एकदा...

पुन्हा हात हाती धरू एकदा,
'कुणी' जिंकण्यासी, हरू एकदा...

जरी वय न झाले, मनाचे तरी,
कसे छेडले तू, स्मरू एकदा...

तुझा उंबरा लांघला रे सख्या;
पुन्हा माप ते चल भरू एकदा...

कधी सोडला हात धुंदीमध्ये,
जरा दु:ख त्याचे करू एकदा...

जगत राहिलो एकमेकांमुळे,
अता त्याचसाठी मरू एकदा...
==========================
हर्षल (२५/४/२०१३ - दु. २.००)

२१.४.१३

थोडंसं मनातलं...

........................संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर, केवळ भुकेचे विचार डोक्यात घोळत राहतात. एरव्ही सुद्धा डोकं फार ताळ्यावर राहतं अशातला काही भाग नाही. पण त्या दिवशी ऑफिसमधल्या टेन्शनचा भार डोक्यावर घेऊन निघालो होतो. खूप असं नाही, पण होतं तेवढंच पुरेसं आणि नकोसं होतं.
........................येरवडा ते पुणे स्टेशनच्या पीएमटीमध्ये बसल्यानंतर, मी माझ्याच विचारांत गुंतलो होतो. आजुबाजूला फक्त गोंधळ ऐकू येत होता. मी ते सगळं ऐकून घेत होतो, त्यातही मनातले आवाज अजून डोकं बधीर करत होते. सेंट्रलला त्या बसमध्ये ती 'चौघं' बसली. अर्थात उभी राहिली; कारण 'आम्ही' जागा व्यापलेल्या होत्या. त्यांचं एकमेकांशी अगदी हसत-खेळत संभाषण चाललं होत. ते काय बोलतायेत याकडे कुणाचं किती लक्ष होतं मलाही ठाऊक नाही. कारण प्रत्येकजण माझ्यासारखाच कुठल्या न कुठल्या विचारांत, कुणाशी बोलण्यांत मग्न होता. बस ट्रॅफीकमधून वाट काढत जात होती.
........................पण तेवढ्या वेळात हळुहळू सार्‍यांचं लक्ष त्या चौघांच्या बोलण्याकडे जायला लागलं. कुणाचं कौतुकाने, कुणी थट्टेने त्यांच्याकडे पहायला लागले. ती चौघं त्यांच्याच जगात हरवलेली होती. एकमेकांशी हातवारे करुन बोलणारी ती अगदी मनमोकळेपणानं; बसमधल्या गर्दीत आपण उभे आहोत याची पर्वा न करता अगदी सहज एकमेकांशी संवाद साधत होती.
........................ माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं, ते ही लोकं नक्की का अशी हातवारे करून बोलताय; आणि संपूर्ण बसमधल्या गोंधळाचा; गर्दीचा त्यांना काहीच कसा फरक पडत नाहीए या विचारामुळे. ती बोलत होती, पण तिथे शब्द नव्हते; हसत होती पण त्या हसण्याला आवाज नव्हता. खिडकीबाहेर धो-धो पाऊस पडावा; पण आपल्याला त्याचा आवाजही येऊ नये; पडणारी प्रत्येक सर आपल्याला ये-ये म्हणुन बोलावतेय आणि तरीही जाता येऊ नये, अशा त्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद ती चौघंच घेऊ शकत होती. त्यावेळी माझ्या मनात एक निर्वात पोकळी तयार झाल्यासारखी मला वाटलं. माझ्या डोक्यातले विचार तोपर्यंत कुठेतरी लांब निघून गेले होते.
........................ आणि मी फक्त त्यांच्या चेहेर्‍यावरच्या निर्मळ आनंदाकडे पाहत होतो. अगदी थोडाच वेळ; मी बसमधून उतरेपर्यंतच मला तो आनंदाचा पाऊस अनुभवता आला. पण त्यात भिजून मला अगदी मोकळं झाल्यासारखं वाटलं. शब्द बोलता येतात; ऐकू येतात; पण त्यांना आजूबाजूच्या समान लोकांसमोर व्यक्त करतांना दहा वेळा अगम्य दुनियेच्या रीती-रिवाजांचा विचार करणारे आपण. आणि एक शब्दही न बोलता हवा तो अर्थ; हवी ती भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य असलेली ती चौघं मला माझ्यापेक्षाही कितीतरी भाग्यवान वाटली. ती एकमेकांच्या हृदयाची भाषा बोलत होती असं मला वाटलं.
........................ आणि मला मात्र माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी किती शब्द वेचावे लागतात?
 

१७.४.१३

काळ आहे लोटला...

जाहली पोटामध्ये गलबल इथे,
चालला आहे कशाचा खल इथे?

थेंब पाण्याचा मिळेना दूरवर,
वाहतो डोळ्यांतुनी बादल इथे...

हुकुमशाहीचा म्हणे धिक्कार अन्,
वागणे यांचे जसे मोघल इथे...

माजले नेतेच दरवेशापरी,
नाचते जनता जसे अस्वल इथे...

सोड कागाळ्या जगाच्या बैस रे,
मागवू आपण चहा स्पेशल इथे...

काळ आहे लोटला, विसरून जा,
दु:खही भासे नवे 'हर्षल' इथे...
--------------------------------------
हर्षल (१७/४/२०१३ - दु. ३.३०)

१५.४.१३

दोन मी...


जरी खुले आकाश मला,
कळे न; जावे कुण्या दिशेला,
गुंतत जातो स्वतःत मग मी,
शोधत बसतो स्वतःस मग मी...

देत जगाला तोंड एक तो,
दुसरा शोधे जगी कोण मी?
कुणास नाही ठाऊक माझे,
माझ्यामधले असे दोन मी...
-----------------------------------------
हर्षल (१४/४/१३ - सायं. ७.४५)

४.४.१३

वसंता तुझ्या येण्याने...

वसंता तुझ्या येण्याने, फार न काही बदलले,
पक्षी मुक्त जाहले आणि वृक्ष जरी अन् मोहरले...

रूक्ष उन्हाचा असह्य चटका, काहिली करे अंगांची,
जाळून आलो दुर्गुण, केली उधळण जरी अन् रंगांची...

वणवण करिती बांधव माझे, दोन घोट पाण्यासाठी,
लाख घोषणा कुणी करो, म्हणो देश जरी अन् त्यांपाठी...

अता न सुचती कविता मजला, आईच तेव्हा आठवते,
डोळ्यांमधले पाणी सुद्धा, पळीत जरी अन् साठवते...

..........................................................

वसंता तुला एक मागणे, नियम मोडून देशील का?
आगमनाच्या आनंदाला, पाऊस घेऊन येशील का?
--------------------------------------------
हर्षल (४/४/२०१३ - दु. १.००)

२६.३.१३

मेरी उडान...

फिर वही बाते, फिर वही चेहेरे,
वही याँदे, वही सारे,
बीते दिनकी बात निकाले,
लेकर आते रोती शक्ले,
नया कुछ करते नही,
जिंदगीमें रंग भरते नही,
और गुजरे पिछली गलियोंसे,
अपनें छुटे निशाँन ढुंढते...

क्यूँ ना होता पाना खुदको इतनाभी आसान?
सीख ज्यों होती हरेक मोड की कभी ना एकसमान...

दिन के बाद आए रात, रोज नया सवेरा,
एक डाल पर पँछीभी ना रोज करे बसेरा...
जिस दिन बाँधे पंख खुदहीने,
छोड दी बीच उडान,
लाख मिलेंगे बुझे सितारे,
पडे कही सुनसान...

करो नजारा खुली आँखसे,
दुनिया देखो नयी सोचसे,
बदला जाता रोज किनारा,
तैर ना पाता कभी जो हारा,
या तो ढूँढो सागर न्यारा,
मन में रखलो कोई तारा,
मँजीलतक ना पहूँचो जबतक,
रुकने ना दो खुदको तबतक...
अपने मन में ले लो ठान,
रोक सके ना मुझको कोई,
और ना मेरी उडान...
और ना मेरी उडान...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२६/३/२०१३ - ११.४५  PM)

२५.३.१३

नसतेस ऑनलाईन तू...


नसतेस ऑनलाईन तू, इंट्रेस्टच निघून जातो,
तुजवीण कुणी आवडेना, पण ऑप्शन पाहून घेतो...

येतो मी फेसबूकवरती, बोलण्या तुझ्याशी काही,
असतेस ऑफलाईन तू, मज काही समजत नाही,
मग दोनदोनदा तुझ्या त्या, प्रोफाईलवरती जातो,
अन् प्रोफाईलच्या पिकला, मी तासन् तास पहातो...

दिसतात तुझ्या अपडेट, कोपर्‍यात उजव्या जेव्हा,
आहेस ऑनलाईन तू, हे कळते मजला तेव्हा,
पण चॅटींगसाठी तुजला का भाव गडे लागतो?
क्षणभर बोलायासाठी, मी रात्रभर जागतो...

तू तरीही बोलत नाही, काहीही सांगत नाही,
वाटे जरी "खूपच झाले", तरी वाट बघत मी राही...
या फेसबूकाचासुद्धा, आता कंटाळा येतो,
काहीही मिळकत नाही, पण त्रास फुकाचा होतो...

एवढे करूनही जेव्हा, मज तुझी आठवण येते,
ना राहवून ती मजला, मग येथे घेऊन येते,
नवनवीन पाखरांचा, मज पत्ता मिळूनी  जातो,
क्षणभर का होईना मी, अन् तुलाच विसरून जातो...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२५/३/२०१३ - रात्रौ. ११.२०)

२२.२.१३

जमेल का तुला...

निघायचे असेल ना? जपून जा,
घरात काय राहिले, बघून जा...

सुने तुझ्याविना असेल देवघर,
(सुगंधरूप त्यात तू भरून जा...)

छतास उंच राहिले करायचे,
इथून तू हळूच अन् लवून जा...

सुके
बाग ही तुझ्या विना, जरा;
फुलांस स्पर्श एकदा करून जा...

जमेल का तुला फिरून पाहणे?
जमेल त्याक्षणी पुन्हा वळून जा...

पुरे मनात आसवांस ढाळणे,
इथेच यायचेय ना?, हसून जा...
----------------------------------------------------------------
हर्षल (२२/२/१३ - सकाळी १०.३५)

१६.२.१३

नि:शब्द प्रेम माझे...

पैशात फार थोड्या भागेल एक दिवशी,
प्रेमात सर्व आहे, समजेल एक दिवशी...

दु:खास अंत नाही, समजून वाग ना तू,
सुख भोगण्याची तर्‍हा, बदलेल एक दिवशी...

सांभाळ तू घराला, अंधार मी पहातो,
समई उजेड देती, गवसेल एक दिवशी...

नि:शब्द प्रेम माझे, सांगू कसे तुला मी?
विसरावयास दैन्य, विनवेल एक दिवशी...

आहे जरी कफल्लक, दिलदारही मी आहे,
जागा तुझ्या मनी मी मिळवेल एक दिवशी...

आभाळ फाटलेले, दे हात तू जरासा,
लढतोय एकट्याने, उसवेल एक दिवशी...
---------------------------------------------------------------
हर्षल (१६/२/१३ - रात्रौ. १०.३५)
---------------------------------------------------------------

२९.१.१३

खाँमोशीमें सुन सको...

खाँमोशीमें सुन सको जिन्हे, गीत जब गाता है कोई,
तब लगता हरदम उसने जीने में चोंटें है खाई...

दिल तक पहूँचे ये उसके आवाज की ताकत है ,
दिलसे निकले लफ्ज, किसीसे चाहत की गेहराई...

अब तक बरसें बादल जो, पिछली बारीश के थे,
अब तक ढूँढ रहा हूँ मैं तो सर पर साया कोई...

भूलना चाहे भी तो, ये याद तेरी मुश्कील जालीम,
वक्त से आगे भागती, तेरी तरफ मेरी तनहाई...

बस अकेला मैं रहा, दुसरा कोई नहीं हमनवाँ,
रास्तेभर धूँप-छाव से लडती रही ये परछाई...
-------------------------------------------------
हर्षल (२९/१/२०१३ - रात्रौ. १२.१५)